डॉ. श्रीपाल सबनीस ः विद्या विकास मंदिरमध्ये पारितोषिक वितरण
बेल्हे – नथुराम गोडसेंची देशात मंदिरं उभी करण्याची चळवळ काही लोकांनी सुरू केली आहे. त्यामुळे खरे देशभक्त कोण महात्मा गांधीजी की नथुराम गोडसे, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला असल्याची खंत महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.
जनता विकास मंडळ राजुरी संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, राजुरी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, पंचायत समितीा सदस्या सारिका औटी, आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी. वाय. मुजावर, गावचे सरपंच एम. डी. घंगाळे, पप्पु हाडवळे, माऊली शेळके, उंचखडक सरपंच दत्ता कणसे, संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील औटी, सुरज वाजगे, मुख्याध्यापक शिवाजी लांडे उपस्थित होते.
यावेळी आमदार अतुल बेनके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. वर्षभरात विविध स्पर्धामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या तसेच इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत प्रथम तीन क्रमांकांत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन जी. के. औटी यांनी केले. प्राचार्य शिवाजी लांडे यांनी आभार मानले.