अनंतकुमार हेगडे यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या आणखी एका वक्तव्याने वाद निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी चक्क महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधींजींचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच अशा लोकांना भारतात महात्मा म्हणून कसे काय संबोधले जाते?असा सवालही हेगडे यांनी केला आहे.
BJP’s Anantkumar Hegde calls Gandhi’s freedom struggle a ‘drama’
Read @ANI Story | https://t.co/wKd2sIQg18 pic.twitter.com/9asj9tUBps
— ANI Digital (@ani_digital) February 3, 2020
बंगळूरु येथे शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी हे विधान केले आहे. हेगडे हे उत्तर कन्नडचे खासदार आहेत. संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. या चळवळीतील नेते म्हणवणाऱ्यांना एकदाही पोलिसांची लाठी खावी लागली नाही. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठे नाटक होते. ब्रिटिशांची परवानगी घेऊन उभारलेले हे एक ढोंग होते. ही तडजोडीची स्वातंत्र्य चळवळ होती, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह ही देखील ढोंगं होती, देशात लोक कॉंग्रेसला पाठिंबा देताना सांगतात की, त्यांच्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, हे खरे नाही. ब्रिटिशांनी सत्याग्रहामुळे देश सोडलेला नाही, असेही अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे.
ब्रिटिश नैराश्याच्या गर्तेत अडकल्याने त्यांनी भारतावरील अंमल सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जेव्हा मी आपला स्वातंत्र्याचा इतिहास वाचतो तेव्हा माझे रक्त उसळायला लागते. असा इतिहास सांगितल्यामुळे असे लोक देशात महात्मा बनले आहेत, अशा कटू शब्दांत खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली.