मृदुला सिन्हा, राज्यपाल, गोवा
गांधीजींच्या विचाराने भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या विचारातून केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक महान संदेश दिले गेले. असे असले तरी त्यांचे विचार, आंदोलन याचे आकलन करताना त्यांच्या दिनचर्येतून मिळालेली शिकवण आपण विसरतो. महात्मा गांधीजींची संपूर्ण दिनचर्या ही स्वच्छतेवर आधारलेली होती.
देशातील सर्व नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे महात्मा गांधी यांचे मत होते. आपल्याला महात्मा गांधी यांच्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारांतून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गांधीजींच्या विचाराने भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या विचारातून केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक महान संदेश दिले गेले. असे असले तरी त्यांचे विचार, आंदोलन याचे आकलन करताना आपण त्यांच्या दिनचर्येतून मिळालेली शिकवण विसरतो.
महात्मा गांधीजींची संपूर्ण दिनचर्या ही स्वच्छतेवर आधारलेली होती. त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या सर्व महिला आणि पुरुष हे स्वच्छतेवर भर देणारे होते. स्वत:च्या हाताने घराची आणि परिसराची साफसफाई करणे ही गोष्ट केवळ गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांची जीवनशैलीचा भाग नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच स्वच्छतेवर आधारलेले होते. गांधीजींनंतर त्यांच्या आश्रमात आणि विद्यालयात साफसफाईवर भर राहिला, मात्र, उर्वरित देशाने स्वच्छतेचे अनुकरण केले नाही.
गांधीजींनी आपल्या आत्मकथेत स्वच्छतेशी निगडीत अनेक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. आपल्या आयुष्यात स्वच्छता असणे किती गरजेचे आहे हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. आरोग्यासाठी स्वच्छता असणे किती आवश्यक आहे हे पटवून देण्याबरोबरच स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करण्याचे कार्यही गांधीजींनी केले आहे. अंगण झाडणे किंवा घराची साफसफाई करण्यास लोक तयार झाले. मात्र, घरातील शौचालय स्वच्छ करण्यासाठी लोकांना तयार करण्यात गांधीजींना खूप मेहनत घ्यावी लागली. राजकोट येथे जेव्हा प्लेगचा फैलाव झाला, तेव्हा ही वेळ हातावर घडी घालून बसण्याची नाही, हे गांधीजींना कळून चुकले.
शहरात, परिसरात साफसफाई मोहीम राबवून संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखता येऊ शकतो, हे गांधीजींनी लोकांना पटवून सांगितले. महात्मा गांधींनी अशा मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारला पत्र लिहिले. प्लेग आजाराचे वाढते गांभीर्य लक्षात घेता तत्कालीन सरकारने समिती नेमली आणि त्यात गांधीजींचा समावेश करण्यात आला. यादरम्यान राजदरबारातील लोकांच्या घरातील स्वच्छता पाहण्यासाठी समिती गेली असता तेथील शौचालय हे घाणेरड्या स्थितीत आढळून आले. जेव्हा वैष्णव मंदिरात गेले तेव्हा तेथेही मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य होते. याउलट साफसफाई करणाऱ्या नागरिकांच्या घरी शौचालय अतिशय स्वच्छ असल्याचे आढळून आले. त्यामुळे समितीच्या अन्य लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
राजकोटमध्येच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथेही प्रवासात प्लेग आजाराचा फैलाव झाला तेव्हा भारतीय नागरिकांच्या वस्तीत अस्वच्छतेमुळेच आजाराची लागण झाल्याचे महात्मा गांधींनी म्हटले आहे. त्यामुळे तेथेही सफाई मोहीम सुरू करण्यात आली.
बिहारच्या चंपारण येथे गांधीजींनी स्वच्छता मोहिमेचाच विचार केला. चंपारण भागात स्वच्छता ही नावालाही नव्हती. तेथे स्वच्छता मोहीम परिणामकारक करायची असेल तर गावात शिक्षणव्यवस्था अंमलात आणणे गरजेचे आहे, हे गांधींजीच्या लक्षात आले. शिक्षणाचे कार्य करण्यासाठी गांधीजींनी गावातील काही कमी शिकलेल्या महिलांना तयार केले. त्यांच्या शिक्षणाचा अर्थ केवळ शब्दांची ओळख असे नाही, तर त्यांच्या जीवनावर व्यापक परिणामही होणार होता.
गांधीजी म्हणत, मला केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच समाधान मानायचे नव्हते, गावातील घाणीला मर्यादा नव्हती. गल्लीबोळात सर्वत्र घाण पसरलेली होती. दुर्गंधीने परिसर दूषित झाला होता. अशा घाणीकडे पाहण्याची देखील इच्छा होत नव्हती. म्हणूनच चंपारण्य भागातील घाण दूर करण्यासाठी मोठ्या मंडळींना स्वच्छतेचे शिक्षण देणे गरजेचे होते. अर्थातच हे काम खूपच कठीण होते. नागरिक स्वच्छतेसाठी तयार होत नव्हते. हीच स्थिती आज देशात कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे गांधीजींचा स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.