कोल्हापूर /प्रतिनिधी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री या उपक्रमांतर्गत मास्क नसलेल्या नागरीकांना महानगरपालिकेच्यावतीने आणि चेंबर ऑफ कॉमर्स तसेच विविध व्यापारी असोशिएशनच्या सहकार्याने मोफत मास्क आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने त्यांचे स्वागत करण्यात आले व यापुढे कायम मास्क लावण्याचा सल्लाही दिला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री ही मोहिम गतीमान केली आहे. मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा यासाठी सर्वदूर जनजागृती मोठया प्रमाणात होत असतानाही काही नागरीकांनी कोरोना संसर्गाचे गांभिर्य घेतलेले दिसत नाही, उलट कित्तेक नागरिक विनामास्क रस्त्यावरुन फिरतांना आढळतात, या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि चेंबर ऑफ कॉमर्स, महाव्दाररोड व्यापारी असोशिएशन, कापड व्यापारी संघ अशा शहरातील विविध व्यापारी असोसिएशन व संघटनांच्या सहकार्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर आज दंडात्मक कारवाई न करता त्यांची गांधीगिरी पध्दतीने मास्क आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
बिनखांबी गणेश मंदीर परिसरात महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्या हस्ते आणि नगरसेवक तौफिक मुलानी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते विनामास्क फिरणाऱ्यांना मोफत मास्क आणि गुलाबपुष्प् गांधीगीरी पध्दतीने देण्यात आले. या गांधीगिरीमुळे शहरात सर्वजण या पुढील काळात मास्क वापरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करतील अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
नो मास्क नो एंट्री हा उपक्रम गतीमान करण्यासाठी आजच्या मोफत मास्क देण्याच्या गांधीगिरी बरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटीपर्यंत जनजागृती रॅली काढून नागरिकांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क देऊन मास्क वापरण्याचे फायदे सांगण्यात आले.
कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेने जारी केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांचे सर्व नागरीकांनी तंतोतंत पालन करावे. असे आवाहन करुन अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई म्हणाले, नागरीकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, वारंवार हात धुणे अशा प्राथमिक पण महत्वाच्या उपाययोजना कराव्यात. याबरोबर मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूहीनाही ही मोहिम यशस्वी करण्यात नागरिकांबरोबरच व्यापारी बांधवांनी सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आजच्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई,नगरसेवक तौफिक मुलानी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव यांच्यासह महापालिकेच्या विविध पथकांचे प्रमुख सतेच जयंत गोयानी, मधुर डोईफोडे, संपत पाटील, अजित कोठारी, संजय पाटील, धनंजय दुगे, सनी जाधव, आनंदसिंह शितोळे, दिपक हातीगणे यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्स तसेच विविध व्यापारी असोशिएशन आणि संघटनाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.