कोलकाता : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा आल्यासारखे दिसत आहे. त्यात कॉंग्रेसचे अध्यक्षपद फिरून गांधी घराण्याकडेच गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, यावरूनच कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. गांधी-नेहरू कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्षाचे नेतृत्व करणे अवघड होईल, कारण या कुटुंबाची एक ब्रॅंड इक्विटी आहे, असे मत कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. कॉंग्रेससारखा मजबूत विचारसरणीचा पक्षच भाजपचा जातीयवादी रथ रोखू शकतो असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कॉंग्रेसविषयी आपली भूमिका मांडली. प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे काम करीत आहेत त्यावरून ते आगामी काळात आपले महत्त्व हरवून बसतील. याचाच अर्थ देश द्विररुवी राजकारणाकडे आगेकूच करील. अशी राजकीय परिस्थिती आल्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकतो. त्यामुळे कॉंग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे. चौधरी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमध्ये वैचारिक प्रेरणेचा अभाव आहे. तथापि, कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना व्यापक समर्थन आहे. पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यास सोनिया गांधी अनिच्छुक होत्या; पण राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्ष संकटात असल्याचे पाहून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची विनंती मान्य केली असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.