मुंबई- देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा मृत्यू संपूर्ण देशाने पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत. त्यांना आजही धोका आहे. अशा स्थितीत त्यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे दुर्दैवी आहे, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत प्रियांका गांधी यांना निवासस्थान रिकामे करण्याच्या आदेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रियांका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे दुर्दैवी आहे. आजही त्यांच्या कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना धोका आहे. असे असताना केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणे अयोग्य आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत आहे. प्रियांका गांधी सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जाब विचारत आहेत. त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे राजकीय द्वेषातून कारवाई करून काहीही होणार नाही.
सरकारकडे प्रियांका गांधी उपस्थित करत असलेल्या या प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्यामुळेच अशा गोष्टी करून सरकार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कॉंग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारत राहील. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहील, असेही त्यांनी नमूद केले.