मुंबई – देशभरात मंदिरे सुरू आहेत. महाराष्ट्रातच बंद आहेत. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून गणरायाला साकडे घातले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.
मंदिरे सुरू करण्याची आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत. आमचे 33 कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत. कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतेय. मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत. या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की मदिरालय सुरू होऊ शकते तर मंदिर का नाही? सरकारने हवं तर नियमावली लावावी आणि मंदिरे सुरू करावीत असे ते म्हणाले.
कॉंग्रेसलाही टोमणा
यावेळी त्यांनी कॉंग्रेसलाही चिमटे काढले. कॉंग्रेसचे वर्णन हे शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा वेगळे असूच शकत नाही. कारण कॉंग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असे म्हणतात की, मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबांनी केलं आहे. कॉंग्रेसला ते चपखल लागू पडते, असा टोलाही त्यांनी लगावला.