जनतेपुढे वस्तुस्थिती झाली स्पष्ट : घटनात्मक संस्थांवरही पडला प्रभाव
पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस जी उलथापालथ सुरू होती आणि त्यातून जी मोठी अस्थिरता निर्माण झाली होती, त्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांची मीडियापुढे एकत्रित परेड करून संख्याबळ दाखवण्याचा जो निर्णय घेण्यात आला तो निर्णय या स्थितीवर मात करण्यासाठीचा गेमचेंजर ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळेच महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण फिरले आणि बहुमत महाआघाडीच्याच बाजूला आहे हे लख्खपणे जनतेच्या समोर आले. टीव्ही मीडियाच्या माध्यमातून घटनात्मक संस्थांनाही ही बाब स्पष्टपणे समजली त्याचाही लाभ महाआघाडीला झाला. भाजपचे अवसान त्यातून गळून पडले आणि अजित पवारांच्याही हालचालींना मर्यादा आली, असे सारेच लाभ या एका इव्हेंटमुळे पदरात पाडून घेता आले आहेत.
पंचतारांकित हॉटेलातच महाविकास आघाडीचे 162 आमदार एकत्रितपणे मीडियापुढे दाखवले गेल्याने देशभर महाराष्ट्रात आज नेमकी काय सिच्युएशन आहे हे प्रभावीपणे लोकांच्या लक्षात येऊ शकले. विशेष म्हणजे या इव्हेंटचे टायमिंगही अचूक ठरले. सुप्रिम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणाचा निर्णय दिला जाईल, असे घोषित केल्यानंतर त्याच्या आदल्या दिवशीच सोमवारी हा इव्हेंट करण्यात आला. तो नॅशनल टीव्ही मीडियानेही उत्तम कव्हर केला. त्यामुळेही अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपुढेही अनौपचारीकरित्या घडवण्यात आलेली ओळख परेड ठरली. त्यामुळे कोर्टाचा अपेक्षित निकाल येण्यासाठीही हा निर्णय सहाय्यभूत ठरल्याचे मानले जात आहे.
तसेच महाराष्ट्रातल्या राज्यपालांनाही यानिमित्ताने संख्याबळाचे दर्शन घडवण्यात ही महाविकास आघाडी यशस्वी ठरली. सरकारच्या बहुमताची जुळवाजुळव करणाऱ्या भाजपच्या चाणक्यांनाही या एकत्रित 162 च्या संख्याबळाच्या दर्शनाने निश्चितच धडकी भरली असावी त्यामुळेच त्यांचा अवसानघात करण्यासही ही खेळी सहाय्यभूत ठरली आहे.
वास्तविक शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत असल्याची इतके दिवस नुसतीच चर्चा होती. त्यांचे नेतेच केवळ एकमेकांना भेटत होते, पण या तिन्ही पक्षांचे आमदार एकत्रित येण्याचा प्रसंगच या दिवसांत कधी उद्भवला नव्हता. त्यातच अजित पवारांच्या नाट्यामुळे त्यांच्याबरोबर नेमके किती आमदार गेले आहेत याविषयीही उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदारांच्या संख्याबळाविषयी जे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात होते त्याला खतपाणीच मिळत राहिले होते. हा भ्रम आणि संशय एका क्षणात दूर करण्याचे प्रभावी कामही या चलाख खेळीने साधले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या खेळीचे नेमक शिल्पकार कोण हे मात्र अजून गुलदस्त्यातच राहिले आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पारंपरिक राजकारण करणारे आहेत. कोणत्याही कृत्याला कायदेशीर आधार आहे का हे तपसणारे हे नेते आहेत. हॉटेलात दाखवण्यात येणाऱ्या संख्याबळाच्या प्रयोगाला कायदेशीर अर्थ नसल्याने दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी बहुधा या संकल्पनेला विरोधच केला असण्याची शक्यता आधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्याच आग्रहामुळे ही खेळी झाली असावी असे मानले जात आहे, पण ती अनेक अर्थाने यशस्वी ठरली आहे. हॉटेल हे आमदारांचे संख्याबळ दाखवायची जागा नाही, अशी थट्टा भाजपच्या नेत्यांनीही करून पाहिली, पण जनतेने जेव्हा स्वत:च्या डोळ्याने टीव्हीवर हे बहुमत आजमावले त्यावेळी भाजपचा बहुमताचा दावा खोटा असल्याचे त्यांच्याही लक्षात आणून देण्याचे काम यातून साधले गेल्याचे कवीत्व सध्या रंगले आहे.