वेंगसरकर यांच्याकडून कौतुकासह खंतही व्यक्त
मुंबई – भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू व सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याच्याकडे अफाट गुणवत्ता होती. मात्र, त्याच्या रागीट स्वभावामुळेच त्याची कारकीर्द खूप लवकर संपली. त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले असते तर त्याची कारकीर्द आणखी लांबली असती, असे मत भारतीय संघाचे माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी कोणतेही कारण नसताना व कामगिरी सातत्यपूर्ण होत असतानाही मला संघातून वगळले होते, अशी टीका गंभीरने केली होती. याबाबत एका लाइव्ह चॅट शोमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर वेंगसरकर यांनी आपले मत मांडले. गंभीर ज्या सकारात्मकतेने व संयमाने फलंदाजी करायचा त्याचे मला खूप कौतुक होते. मात्र, मैदानावर तसेच मैदानाबाहेरही अनेकदा त्याचे स्वतःवरचे नियंत्रण हरवलेले पाहिले आहे. तो स्लेजिंगला त्याच भाषेत उत्तर द्यायचा. गंभीर एक भावनिक व्यक्ती आहे, त्यामुळे शाब्दिक चकमक सातत्याने होत होती. याबाबत अनेकदा त्याला सल्ला दिला. मात्र, त्याने स्वतःमध्ये कधीच बदल व्हावा यासाठी प्रयत्न केले नाहीत, असेही ते म्हणाले.
गंभीरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्याचा खेळ पाहिला आहे. एक अफाट क्षमतेचा खेळाडू केवळ स्वभावावर नियंत्रण न राखल्याने संघाबाहेर गेला याची आजही खंत वाटते. तो जेव्हा निवृत्त झाला त्यावेळीही त्याची कारकीर्द आणखी किमान दोन वर्षे वाढली असती असेही मी म्हणालो होतो, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.