आंदर मावळातील प्रकार : ग्रामस्थांनी केला विरोध
टाकवे बुद्रुक – करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. परंतु काही व्यक्त मात्र याचा मोठ्या प्रमाणावर फायदा उठवताना दिसून येत आहेत. वाहनगाव येथील गायरानाची जागा परस्पर एमआयडीसीच्या माध्यमातून एका खासगी प्रकल्पाला देण्याचा घाट शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. यास वाहनगावच्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. परंतु ऐन लॉकडाऊनमध्ये सातबारा उताऱ्यावर फेरफार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात आलेले हस्तांतरण रद्द करण्याची सूचना आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.
वहानगाव येथे गट क्र.68, 69 व 75 मध्ये एकूण 10.29 हेक्टर जमीन ही गायरानासाठी राखून ठेवली आहे. गावासाठी हे एकमेव गायरान आहे. एका खासगी कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला गायरान जमीन देण्याचा घाट मागील भाजपा-शिवसेना सरकारने घातला होता. त्यास मंजुरीही दिली होती. मात्र ग्रामस्थांनी मात्र या गोष्टीला तीव्र विरोध केला होता. असे असताना ग्रामस्थांचा विरोध झुगारून संबंधित व्यावसायिकाने पाठपुरावा सुरू ठेवला व ऐन लॉकडाऊनच्या काळात म्हणजे दि. 18 ते 21 मे च्या दरम्यान फेरफार करून मूळ कब्जेदार सदरी असलेला मोफत गुरेचरण व ग्रामपंचायत वाहनगाव हे नाव फेरफार क्रमांक 1399 नुसार काढून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई
यांच्या नावाची नोंद केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात ग्रामस्थांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून, आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मुंबई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुणेचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र देऊन संबंधित गायरान जमीन हस्तांतरित करू नये, तसेच कोणत्याही उद्योगपतीकडून रक्कम स्वीकारू नये, अशी सूचना केली आहे. याशिवाय, सात-बारा उताऱ्यावर एमआयडीसीची झालेली नोंद रद्द करावी, अशीही सूचना केली आहे. तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता शासनाने व एमआयडीसीने घेतलेला हा निर्णय अयोग्य असून, याबाबत प्रसंगी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचाही इशारा दिला आहे.