नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी “गगनयान’ या मोहिमेत एक रोबॉट अंतराळात झेपावणार असून त्याचे नामकरण “व्योममित्र’ असे करण्यात आले आहे. “इस्रो’ आजवर चंद्रावर, मंगळावर यानं पाठवली. अनेक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थिरस्थावर केले. अंतराळ संशोधनात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन अन्य देशांचे उपग्रह प्रक्षेपित केले. भारताला विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवलं.
वर्ष 2022 मध्ये इस्रो “गगनयान’ मोहीम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा मानवाला अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी, त्यात कोणतीही चूक होऊ नये यासाठी इस्रोने जय्यत तयारी सुरू केली आहे. या गगनयान मोहिमेचा एक भाग असेल तो ‘व्योममित्र’ हा रोबो. “इस्रो’तर्फे या व्योममित्रचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. व्योम म्हणजे अंतराळ. म्हणूनच अंतराळाचा मित्र तो “व्योममित्र’. “व्योममित्र’ हा अर्धाकृती मानवी रोबो आहे. त्याला महिलेचं रूप देण्यात आलं आहे.
“इस्रो’ गगनयान मोहिमेआधी काही चाचण्या घेणार आहे. या अंतर्गत दोन मानवरहित यानं अवकाशात पाठवण्यात येतील. हा “व्योममित्र’ या दोन्ही मोहिमांमध्ये सहभागी होणार आहे. व्योममित्र मानवाप्रमाणे विविध कृती आणि क्रिया करू शकतो. तो बोलू शकतो, माणसांना ओळखू शकतो, संवाद साधू शकतो, चर्चा करू शकतो आणि हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये प्रश्नांची उत्तरंही देऊ शकतो.
व्योममित्र हा रोबॉट “इस्रो’नेच विकसित केला आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे 2020 च्या डिसेंबरमध्ये भारताचं मानवविरहित यान अंतराळात झेपावेल. त्यानंतर जून 2021 मध्ये इस्रो दुसरं यान अंतराळात पाठवेल. या दोन्ही यानांमध्ये “व्योममित्र’ असेल. व्योममित्रच्या अंतराळातल्या प्रत्येक कृतीकडे इस्रोचं लक्ष असेल.
राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. ते रशियन अंतराळयानातून अंतराळात गेले होते. पण गगनयान मोहिमेअंतर्गत तीन भारतीय अंतराळवीरांना “इस्रो’च्याच अंतराळयानातून अंतराळात पाठवण्यात येणार आहे. भारतीय रॉकेटने सोडलेल्या भारतीय अंतराळयानातून हे अंतराळवीर आकाशात झेपावणार आहेत. त्यामुळे ही मोहीम पूर्णपणे वेगळी असेल.