देशात लवकरच 100 टक्के इथेनॉलवरील वाहने
पुणे – प्रदूषणमुक्त शहरांसाठी भविष्यात 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवकरच देशातील वाहन उत्पादक कंपन्यांना 100 टक्के पेट्रोल अथवा 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचेच इंजिन तयार करणे बंधनकारक करण्यात येणार आहे, असे केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले.
महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, “पुण्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेट्रोलऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल.
पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल स्वस्त असून आर्थिक अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला चालना देण्यासह, इथेनॉलचा वापर वाढल्यास त्याचा फायदा आपल्याच देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्राने पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्टयात विशेषत: पुण्यात 3 पंप सुरू केले आहेत. त्यामुळे आता राज्यशासनाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केल्या.
पुण्यातील वाहन उद्योग कंपन्यांनीही इथेनॉलवर चालणारी इंजिन विकसित केली असून, भविष्यात शहरातील रिक्षांसाठी त्याचा वापर झाल्यास प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. ब्राझिलमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी सर्व कंपन्यांची वाहने असून तशाच प्रकारे भारतातही याबाबत निर्णय झाल्यास मोठ्या शहरांतील प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.
भूसंपादन मोबदल्याचे निकष बदलणार
“रस्ते तसेच इतर विकासकामांबाबत भूसंपादन निधीच्या निकषांवर लवकरत चर्चा करण्यात येणार आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. काही भूसंपादनात एक एकर जागेसाठी शासनाला 18 कोटींचा मोबदला द्यावा लागला आहे. राज्यातील रस्ते, तसेच इतर कामांसाठी इतक्या प्रमाणात मोबदला द्यावा लागल्याने विकासासाठी निधी राहणार नाही. त्यामुळे या भूसंपादनातून जागा मालकावर अन्याय होणार नाही, तसेच शासनावरही भार येणार नाही अशा पद्धतीने लवकरच तोडगा काढणार आहोत, असे पवार यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.
पुणे-बंगळुरू आणखी एक द्रुतगती महामार्ग
पुणे-फलटण- बंगळुरू असा आणखी एक द्रुतगती मार्ग लवकरच उभारण्यात येणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. या रस्त्यांसाठी राज्याकडून भूसंपादन वेळेत होणे गरजेचे आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बैठक घेण्यात येणार आहे. यात मुंबई-दिल्ली महामार्ग तसेच राज्यातील इतर रस्त्यांच्या भूसंपादनावरही चर्चा केली जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
उड्डाणपूल दोन मजली करा
सिंहगड रस्त्यावरून दिवसाला तब्बल 1 लाख 40 हजार वाहनांची वर्दळ असते. ही आकडेवारी पाहता, रस्ते बांधणीच्या सुधारित निकषांनुसार, येथे तब्बल 18 लेनचा रस्ता आवश्यक आहे. मात्र, सध्याची शहराची स्थिती पाहता हे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने या रस्त्यावर दोन मजली उड्डाणपूल बांधावा, अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली. गडकरी म्हणाले, रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा उड्डाणपूल उभारला जात आहे. तो सुमारे दोन किलोमीटरचा असणार आहे. मात्र, रस्ते बांधणीच्या निकषानुसार, हा पूल वाहनांना कमी पडणार आहे. त्यामुळे महापालिकेने या पुलाचे काम करताना तो दुमजली बांधावा तसेच तिसऱ्या मजल्यावर मेट्रोसाठीचा खांब तयार असावा. त्यामुळे भविष्यात या भागातून मेट्रो गेल्यास त्याला फायदा होईल.