मुंबई – वर्ष 2010 पासून सुरु झालेल्या पुणे-सातारा महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेली 11 वर्षे प्रलंबित आहे. विशेषत: पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील सारोळा येथील नीरा नदी पूलापर्यंत किमान तीन मोठ्या उड्डाणपूलांची कामेच झालेली नाहीत. या दिरंगाईला निधी पुरवणारी ऍक्सिस बॅंक जबाबदार असल्याची माहिती खुद्द केंद्रिय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सदर बॅंकेने कंत्राटदाराला टोलद्वारे जमा झालेला निधी हस्तांतरीत न केल्याने हे काम प्रलंबित राहिले असे गडकरी यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, या विलंबाला स्थानिक गावकऱ्यांचे असहकार्य आणि विरोध असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गतवर्षी “दै. प्रभात’ला सांगितले होते. त्यामुळे या दिरंगाईमागील कारणाचे गूढ वाढले आहे.
महामार्गाच्या प्रलंबित कामांबद्दल ऍक्सिस बॅंकेवर कारवाई करण्याबाबतचे पत्रही त्यांनी पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचे नमूद केले आहे. पुण्यामध्ये नुकताच नितीन गडकरी यांनी चांदणी चौक उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी शहरात होणारे इतर उड्डाणपूल आणि महामार्ग या संदर्भातही उत्तरे दिली.
सातारा रस्त्याचे काम मार्चअखेर पूर्ण होईल…
सातारा रस्त्याचे काम मार्चअखेर पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. सातारा महामार्गासाठी टोलची संपूर्ण रक्कम ऍक्सिस बॅंक त्यांच्याकडे जमा करून घेत होती. ती रक्कम कंत्राटदाराला दिलीच गेली नाही. यामुळे या सगळ्या कामाला उशीर झाला आहे. याबद्दल मी ऍक्सिस बॅंकेवर कारवाई करावी, असे पत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना लिहिले आहे.
बॅंकेवर जरी कारवाई केली जाणार असली तरी कंत्राटदार असणाऱ्या रिलायन्सचे काय याबाबत विचारले असता कारवाई केल्यावर कोर्ट केस होते आणि त्यात दिरंगाई होते. त्यामुळे कारवाई न करता काम पूर्ण करण्याकडे लक्ष असल्याचेही ते म्हणाले. या रस्त्यावर चार पुलांचे काम सुरू असून ते मार्चअखेर संपेल, असा दावाही त्यांनी केला. एकूणच तारीख पे तारीख मध्ये अडकलेल्या सातारा महामार्गाच्या कामाला आता अजून एक नवी तारीख मिळाली आहे. आता या नव्या मुदतीत तरी काम पूर्ण होणार का पाहावे लागेल.