अकोला – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबईसारखे शहर पावसामुळे जलमय झाले. पावसाच्या पाण्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जिवीतहानी झाल्याचे बघायला मिळाले आहे. असे असताना अकोला जिल्ह्यातील पूराच्या पाण्यात अडकलेल्या 17 नागरिकांना गाडगे बाबा आपत्कालीन पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.
विदर्भात जोरदार पाऊस झाला असून अकोला जिल्ह्यात प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बार्शीटाकळी रस्त्यावरील चंद्रपुर येथील कवादे कुटुंबातील तीन, बार्शीटाकळी येथील खोलेश्वर मंदीरा समोरील विद्रुपा नदीपात्रातील असलेल्या स्मशानभूमीत अडकलेल्या आई वडील आणी मुलासह तिंघांना तसेच स्मशानभूमीत राहणारे पिराजी एल्लपा कोंडेवार वय (40), पत्नी राधाबाई पिराजी कोंडेवार वय (35) मुलगा अर्जुन पिराजी कोंडेवार वय (12) रा.बीलोली जिल्हा नांदेड यांना सुखरुप बाहेर काढले. एकूण 17 नागरिकांना रेस्क्यु केले आहे
आज तुम्ही आला नसता तर आमचे काय झाले असते देवासच ठाऊक अशी भावना व्यक्त करताना नागरिकांच्या डाेळ्यांतून अश्रु वाहू लागले. रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. दरम्यान गाडगे बाबा आपत्कालीन पथकाच्या कामगिमुळे त्यांच्यावर कौतुकाचा पाऊस पडत असल्याचे दिसुन आले आहे.