माधव विद्वांस
दुर्गप्रेमी, इतिहासकार, संतचरित्रकार, अशा ऋषीतुल्य कै. गोपाळ नीळकंठ दांडेकर तथा सगळ्यांचे “आप्पा’ यांचे आज पुण्यस्मरण. त्यांना “गोनीदा’ या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे 8 जुलै 1916 रोजी झाला तेथे त्यांचे वडील शिक्षक होते. ते वयाच्या 12 व्या वर्षी सातव्या इयत्तेत असताना घर सोडून पळून गेले. स्वातंत्र्यलढ्याचे त्यांना खूप आकर्षण होते. दरम्यानच्या काळात गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी त्यांच्याबरोबर गावोगाव हिंडले. भ्रमण गाथा या पुस्तकामध्ये गाडगे महाराजांसोबतचे अनेक प्रसंग नमूद केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या गाडगेमहाराजांच्या चरित्रावर देवकीनंद गोपाळा हा चित्रपट निघाला. त्यासाठी त्यांनी गाडगेमहाराज राहत तेथील बोलीभाषाही अवगत केली होती. त्याचबरोबर ते संस्कृत व वेदांचेही अध्ययन करीत होते.
1947 मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर चरितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि संपूर्ण आयुष्य लेखनावर व्यतीत केले. त्यांनी कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबंऱ्यामधून कोकणातील व्यक्तिरेखा, चालीरिती आणि कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे केले आहे. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन वाचनीय आहे. पवना काठाचा धोंडी, जैत रे जैत हे चित्रपट पाहताना त्यांची भाषाशैली थक्क करणारी आहे.
गो. नी. दांडेकर यांनी 50 वर्षे दुर्गभ्रमण केले. त्यांचे कृष्णायन हे कादंबरीस्वरूप कथानक कृष्णाच्या बाललीला आपल्या समोरच घडत आहेत असे रेखाटले आहे. श्रीकृष्णावरील कादंबरी त्यांपैकी निवडक अशा 115 कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक “गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांनी गणेशायन, श्रीकृष्णगायन, श्रीरामायण, भावार्थज्ञानेश्वरी, भक्तिमार्गदीप, श्रीगणेशपुराण, श्रीकर्णायन, श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम, श्रीमहाभारत, श्री संत एकनाथ, श्री संत नामदेव, श्री गाडगेमहाराज, श्री संत रामदास, कहाणीसंग्रह, श्रीगुरुचरित्र (मूळ), सुबोध गुरुचरित्र, सार्थ ज्ञानेश्वरी अशी आध्यात्मिक ग्रंथ निर्मिती केली. ज्ञानेश्वरी मधील ओव्या संगीतबद्ध करताना लतादीदींनी त्यांच्याकडून संस्कृत उच्चारांचा अभ्यास करून घेतला होता. त्यांनी कादंबरी वाचन या उपक्रमाची सुरुवात 1975 मध्ये केली. ग्रंथाचे अभिवाचन ही चळवळ गोनीदांच्या कुटुंबीयांनी उभी केली. त्यांची कन्या डॉ. वीणा विजय देव प्रसिद्ध लेखिका आहेत. 1 जून 1998 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. आधुनिक ऋषीला अभिवादन.