आळंदीतून काढली अंत्ययात्रा
आळंदी – कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या नामदेव महाराज पालखी सोहळ्यात सासवडच्या दिवे घाटात जेसीबी मशीन शिरून झालेल्या अपघातात मृत्यू झालेले संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांच्यावर आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राम-विष्णू मंदिरातून त्यांच्या अंतयात्रेस सुरुवात झाली शनिमंदिर, महाद्वार समोरून प्रदक्षिणा घालत माउली मंदिर, पुंडलिक मंदिर घाटमार्गे अंत्ययात्रा अंत्यविधीस्थळी विसावली. इंद्रायणी घाटावरच त्यांच्या पार्थिवावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती महाराज कुऱ्हेकर, वारकरी फडकरी संघटनेचे ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, बंडोपंत शिरवळकर, बाळासाहेब उखळीकर, राणू महाराज वास्कर, चिंतामणी महाराज राशिनकर, मारुती महाराज कोकाटे, बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज कबीर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार,पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, नरहरी महाराज चौधरी, आमदार संजय जगताप, माजी आमदार प्रकाश देवळे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कोद्रे, डी. डी. भोसले पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, विजय डोळस, राम गावडे, किरण आहेर, अशोक कांबळे, संजय घुंडरे, देवस्थान प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर, विविध देवस्थान, संस्थाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी सर्वांचे वतीने यावेळी अखेरची श्रद्धांजली वाहिली. पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात तिसऱ्या वळणावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला होता.
या घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. पंढरपूरवरून आळंदीला दिंडी निघाली होती. दिवे घाटात तिसऱ्या वळणावर एक जेसीबी आला. त्याचा ब्रेक फेल झाल्याने ते थेट दिंडीत घुसले. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले होते.