पुणे – चंदननगर आणि खराडी भागातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने काम रखडल्याने अनेकदा नागरिक रस्त्यावरच अंत्यसंस्कार करत आहेत. हे प्रकार सुरू असूनही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने या भागातील स्थानिक नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी शुक्रवारी चक्क स्मशानभूमीतील चितेवर झोपून प्रशासनाचे डोळे उघड्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन केले.
या भागासाठीची ही प्रमुख स्मशानभूमी असून तिची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती. त्यामुळे, दोन वर्षांपूर्वी तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी निधी आहे, की नाही याची वाट न पाहता तातडीची बाब म्हणून सुरू करण्यात आले. मात्र, आता हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी जागा मिळेल तेथे नागरिक अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. या प्रकराबाबत अनेकदा स्थानिक नगरसेवकांकडून महापालिका आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर यांच्याकडे तक्रार करून या कामासाठी आवश्यक निधी तसेच तातडीने काम पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली.
मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यात, पावसाळ्यात तर या ठिकाणी अनेकदा अंत्यविधी सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेक मृतदेह अर्धवट जळाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पुढील पावसाळ्यापूर्वी तरी हे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी आपणच चितेवर झोपून आंदोलन केल्याचे नगरसेवक जाधव यांनी या आंदोलनाबाबत सांगितले.