बलुतेदार क्रांती प्रतिष्ठान संस्थेचा अभिनव प्रयोग
पाबळ – शिरूर तालुक्यातील पाबळ येथे पंधरा कुटुंबाबरोबर सामुदायिक तुळशी विवाह हा उत्सव साजरा करण्यात आला. या संकल्पनेमागे भविष्यात पाबळ येथे जनजागृती करीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा मानस असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
ही भविष्यातील सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी पाबळ येथील बलुतेदार क्रांती प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने हा अभिनव प्रयोग राबवण्यात आला. कुटुंबातील मुला- मुलींचा विवाह करण्याआधी तुलसी विवाह करण्याची पारंपरिक प्रथा आहे. संस्थेने केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
संस्थेच्या आवाहनाला मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद
संस्थेच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा, वृक्ष संवर्धन, पूरग्रस्तांना मदत,विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत, अनाथ आणि बेवारस रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, आदी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सामुदायिक सोहळ्यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केलेले आहेत. त्यानुसार भविष्यात या सोहळ्याचे आयोजन करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
– संजय शेंबडे, खजिनदार, बलुतेदार क्रांती प्रतिष्ठान, पाबळ
पाबळ परिसरात सामुदायिक विवाह सोहळ्याचे अद्यापपर्यंत आयोजन होऊ शकले नव्हते. पाबळमध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा गोरगरीब कुटुंबांमधून व्यक्त केली जात होती. यानुसार संस्थेच्या सदस्यांकडूनही याबाबत विचार व्हावा, अशी मागणी होती. त्यानुसार प्राथमिक प्रयोग म्हणून ही संकल्पना करण्यात आली. त्यानुसार अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. यापुढे सामुदायिक सोहळ्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येणार आहे.
– सोमनाथ सुतार, अध्यक्ष, बलुतेदार क्रांती प्रतिष्ठान, पाबळ