उन्नाव – हल्लेखोरांनी पेटवलेल्या 23 वर्षीय उन्नाव बलात्कार पीडितेवरील अंत्यसंस्कार रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान तिच्या मूळ गावी करण्यात आला. दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तिच्या आजोबांची मजार असलेल्या तिच्या कुटूंबाच्या शेतातच दफन करण्यात आले, याप्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी आणि अधिकारी उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर उपलब्ध करून देण्यात येईल, असे लखनौचे विभागीय आयुक्त मुकेश मेश्राम आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यापूर्वी सर्व स्तरातील ग्रामस्थांनी तिला आदरांजली वाहिली. समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि कमल राणी वरुण हे देखील यावेळी उपस्थित होते. “आम्ही या दु: खाच्या घटनेत पीडित कुटुंबासमवेत आहोत आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याची आम्ही ग्वाही देतो,’ असे ते यावेळी म्हणाले.
दुसरीकडे समाजवादी पार्टीचे विधान परिषदेतील आमदार सुनीलसिंग साजन यांनी उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
आज मुली सुरक्षित नाहीत आणि त्याबाबत “एफआयआर’ नोंदवले जात नाहीत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा, असे ते म्हणाले. तर आमच्या मुलीसाठीचा न्यायाचा लढा यापुढेही सुरूच राहिल असे उन्नावच्या माजी खासदार आणि कॉंग्रेस नेत्या अन्नू टंडन यांनी म्हटले आहे.