पुणे (प्रतिनिधी) – महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा डी.पी.आर. करून प्राधान्य क्रमाने ड्रेनेज, रस्ते, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट आदी कामांसाठी 500 कोटी रुपये निधीची तरतूद करावी. याबरोबरच यापूर्वी समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील शाळा, अंगणवाड्या पालिका प्रशासनाशी जोडून घ्याव्यात तसेच वर्ग करून घेतलेल्या ग्रामपंचायत सेवकांचे पगार नियमित करावेत, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.
आयुक्त विक्रम कुमार यांना त्यांनी याबाबत पत्र दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, नगरसेवक सचिन दोडके, गणेश ढोरे, वंदना धुमाळ, भरत झांबरे यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले.
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये करांबाबत मोठी समस्या आहे. पूर्वी ग्रामपंचायतीकडून आकारला जाणारा कर व महापालिकेकडून आकारला जाणारा कर यामध्ये बरीच तफावत आहे. महापालिकेची कर आकारणी ग्रामपंचायतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्या तुलनेत महापालिकेकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठा, रस्ता आदी सुविधा मात्र या भागात पुरविल्या जात नाहीत, ही बाब सुळे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. महापालिकेने कर आकरणी करताना ती ग्रामपंचायत कराच्या दीड पटीपेक्षा अधिक नसावी, असे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या यांच्या अस्थापना अजूनही जिल्हा परिषदेकडेच आहेत. त्या महापालिकेकडे वर्ग कराव्यात. त्या 11 गावांमधील ग्रामपंचायत कर्मचारी महापालिकेत वर्ग झाले आहेत त्यांना महापालिकेच्या आरोग्य आदी सेवा देण्यात याव्यात. करार पद्धतीवर महापालिकेत काम करणारे आरोग्य तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना तरतूद नसल्याने गेले 4 ते 5 महिने पगार दिला जात नाही, तरी यावर तातडीने कार्यवाही व्हावी. कोविड प्रादुर्भावातही या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. याबरोबरच पूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील चालू कामे, जी निधी अभावी थांबली आहेत, त्यांना 2020-21 च्या बजेटमधील अखर्चित रकमेतून तरतूद करून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत.
नवले पूल भागातील अपघातासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा…
मुंबई बंगळूर बाह्यवळण महामार्गावर नवले पूल येथे होणारे सततचे अपघात रोखण्या संबंधी उपाय योजना राबवण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना सजग महिला मंच, अनिता मुनोत मैत्री ग्रुप, सन्मती महिला मंडळ, नऱ्हे शक्ती ग्रुप, तसेच नऱ्हे गावातील विविध सोसायट्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यानुसार सुळे यांनी लागलीच माहिती घेऊन स्वतः या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच तात्काळ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.