नियोजन शून्य काम; शेतकऱ्यांचे नुकसान
पुणे – जलयुक्त शिवार योजनेतून बांधलेला बंधारा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे पाणी दुसऱ्या बाजूने बाहेर आले. काही ठिकाणी पाणी भरले की बंधारा फुटत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे दौंड तालुक्यासह जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या कामांची चौकशी व्हावी आणि दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे यांनी सर्वसाधारण सभेत केली.
यंदाच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मनुष्यहानीबरोबरच वित्तहानी झाली. विशेषत: दौंड तालुक्यातील मळद येथील बंधाऱ्यामुळे चार जणांचा जीव गेला. याठिकाणी तब्बल साठ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधला. सुरवातीला या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. काही ठिकाणी हे बंधारे चांगल्या प्रतिचे बांधण्यातही आले असतील. मात्र, दौंड तालुक्यातील बंधाऱ्याच्या दर्जाकडे लक्षच दिले गेले नाही. “बंधारा भरत आला की तो फुटणार’ हे ठरलेलं, असा आरोप जगदाळे यांनी केला.
मळद येथील बंधारा कोणतेही इस्टिमेंट किंवा फ्लॅन तयार करून झालेला नाही. सांडवा 60 मीटरचा होता. मात्र, प्रत्यक्षात 25 मीटरचाच असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाणी साठल्यावर त्याला वाट मिळेल तिथून पाणी वाहते. या परिसरात एकूण दोन बंधारे बांधले असून, त्यासाठी 72 लाख रुपये खर्च आला. मात्र, ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने झालेल्या कामाचा दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे सीईओपी यासारख्या त्र्ययस्थ संस्थांकडून बंधाऱ्याची तपासणी करावी आणि दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी अपेक्षा विरधवल जगदाळे यांनी सभागृहात केली.
संबंधित बंधाऱ्यांची तपासणी त्र्ययस्थ संस्थेकडून करण्यात यावी. त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
– निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे