सातार -केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. आगामी काळातही केंद्राच्या लोककल्याणकारी योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यात रेल्वे विभागाशी संबंधित प्रश्नांना केंद्र शासनाकडून चालना मिळण्यासाठीही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही समितीचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी केंद्रीय पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याण योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही खा. श्रीनिवास पाटील व खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात रेल्वे विभागाशी काही प्रश्न असतील ते लेखी स्वरुपात देण्यात यावे. या प्रश्नांना केंद्र शासनाकडून चालना कशी मिळेल यासाठीही प्रयत्न केले जातील. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन खा. पाटील व निंबाळकर यांनी यावेळी केले.