कराड -खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून चाफळ (ता. पाटण) येथील उत्तरमांड नदीवरील नवीन फरशी पुलाच्या बांधकामासाठी 99.88 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबून वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
चाफळ येथे श्री रामाचे मंदिर असून ते तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच विभागाच्या दृष्टीने हे मध्यवर्ती ठिकाण असून मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. त्यामुळे येथे पर्यटक, परिसरातील नागरिक व शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मंदिरापासून गावात जाण्यासाठी एकच मार्ग असल्याकारणाने त्या रस्त्यावर नियमित गर्दी होत असते. आठवडी बाजारादिवशी गावात येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने सातत्याने वाहतूकीची कोंडी निर्माण होत असते.
या पुलामुळे चाफळसह माथणेवाडी, जाळगेवाडी, जंगलवाडी, जाधववाडी येथील विद्यार्थी व रहिवाश्यांची सोय होणार आहे. याशिवाय हा पूल झाल्याने पाडळोशी, दाढोली गावच्या परिसरातील सर्व नागरिकांना चाफळ येथील बॅंक व सरकारी कार्यालयात येण्यासाठी जवळचा व सोयीचा मार्ग म्हणून उपयोग होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी नवीन फरशी पूल बांधण्यात यावा अशी मागणी येथील संभाजीराव देशमुख, ऍड. शिरीष पेंढारकर, जगन्नाथ शिंदे, सुनील शिंदे, शंकरराव पडवळ, बाळकृष्ण इंगळे, वाघजाईवाडीचे संभाजी सुर्ले, जाळगेवाडीचे दादासो जगदाळे, धोंडीराम साळुंखे, जगन्नाथ जगदाळे, जाधववाडीचे योगेश पवार, विश्वनाथ गुजर, रामचंद्र पवार, माथणेवाडीचे हणमंत माथणे, काशिनाथ बोंगाणे यांनी खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.
त्यानुसार खा. श्रीनिवास पाटील यांनी या पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळविण्याकरिता प्रयत्न केले होते. त्यांच्या मागणीवरून येथील उत्तरमांड नदीवर श्री समर्थ विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर फरशी पुलाचे बांधकाम करण्यासाठी 99.88 लाख रकमेचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मार्च 2020 च्या अर्थसंकल्पामध्ये हा निधी मंजूर केला असल्याचे सांगण्यात आले.