पालिका समावेश आणि ग्रामपंचायत निवडणूक यामुळे ग्रामस्थांत संभ्रम
शेवाळेवाडीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
– विवेकानंद काटमोरे
मांजरी – जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षण सोडतीने निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महापालिका प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या शेवाळेवाडी गावाचाही यामध्ये समावेश असून येथील सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी पडले आहे.
मात्र, गाव निवडणुकीपूर्वी पालिकेत समाविष्ट होणार की निवडणुकीला तोंड द्यावे लागणार, असा संभ्रम ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला असला तरी सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपण, बिनविरोध सरपंच होण्याकरिता “गाव पालिकेत जाणार, कशाला उभं राहताय’ असा आयताच फंडा विरोधक कमी करण्यासाठी इच्छुकांना सापडला आहे.
शेवाळेवाडीची लोकसंख्या सुमारे पंधरा हजार व मतदार संख्या पाच हजारापर्यंत असून ही ग्रामपंचायत पालिका हद्दीलगतच आहे. अकरा सदस्य ग्रामपंचायत कारभार पाहत आहे. सरपंच पदाच्या सोडतीत शेवाळेवाडीचे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी पडले आहे. त्यामुळे इच्छुुकांनी तयारी सुरू केली आहे. परंतु, गाव पालिकेत जाणा का? असाही संभ्रम कायम आहे.
राज्य सरकारने यापूर्वी पालिकेत समावेश केलेल्या गावात अद्याप सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. राज्याकडे समाविष्ट केलेल्या गावांना सुविधा देण्यासाठी निधी नाही, अशी स्थिती असताना उर्वरित गावे पालिकेत समाविष्ट करण्याची तयारी कशासाठी? गावाचा विकास करता येणार असेल तरच पालिकेत समावेश करून घ्यावा. अन्यथा, पाच वर्षांच्या पूर्ण कालावधीसाठी येथे ग्रामपंचायत ठेवावी.
– राहुल शेवाळे, भाजप-उपाध्यक्ष, पुणे जिल्हा
शेवाळेवाडी गावची ग्रामपंचायत निवडणूक आणि गाव पालिकेत समावेश या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू आहेत. यात राज्यसरकार ने लक्ष घालून एकतर गाव ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी गाव पालिकेत समाविष्ट करावे किंवा ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर गाव किमान पाच वर्षे तरी पालिकेत घेऊ नये. जेणेकरून ग्रामस्थ आणि सरकारचा पैसा आणि वेळ वाचेल.
– विक्रम शेवाळे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस