कोणालाही घाबरण्याचे कारण नाही – डोवाल
नवी दिल्ली – दिल्लीत आता पुरेशी सुरक्षा दले तैनात करण्यात आली असून कायदा पाळणाऱ्या कोणत्याही नागरीकाला आता तेथे घाबरण्याचे कारण नाही असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. काल रात्री दिल्लीच्या सर्व भागातील दौरा करून त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांवरील माहिती घेतील त्यानंतर ते आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
ते म्हणाले की, दिल्ली पोलिसांची क्षमता आणि कुवत या विषयी लोकांना शंका होती. ती दूर करण्याची गरज होती. नागरीकांनी वर्दीतील अधिकाऱ्यांवर व सुरक्षा जवानांवर विश्वास ठेवला पाहिजे असे ते म्हणाले. दिल्ली पोलिसांनी अत्यंत ढिसाळपणे ही दंगल स्थिती हाताळली याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले. दिल्लीत अपुरे मनुष्यबळ असल्याची खंत खुद्द दिल्लीच्या पोलिस आयुक्त्यांनीच व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर तेथे जादा सुरक्षा दले तैनात करण्याची गरज होती. त्यानुसार तेथे आता ही दले तैनात करण्यात आली आहेत.
डोवाल म्हणाले की दंगलग्रस्त भागातील नागरीकांमध्ये असुरक्षेचे वातावरण होते. सर्वच धर्मियांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याला प्राधान्य देण्याची गरज होती असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत पोलिसांनी प्रयत्न करून सुद्धा या स्थितीवर नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य झाले नसल्याने दिल्लीत आता लष्कराला पाचारण केले जावे अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली तसेच दंगलग्रस्त भागात त्वरीत संचारबंदी लागू करण्याची मागणीही त्यांनी केली.