नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. दरम्यान, याच इंधन दरवाढीवरून विरोधक आक्रमक होत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपला पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्याने इंधन दरवाढीवरून घरचा आहेर दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सुब्रमण्यम स्वामी यांनी जोरदार टीका करत इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्थसंकल्पामधील वित्तीय तूट अर्थमंत्रालय इंधनदरवाढ करुन भरुन काढत असल्याचा दावा करत स्वामी यांनी हे असं करणं म्हणजे आर्थिक परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचे लक्षण असल्याचा टोला लगावला आहे.
The daily rise in Petrol Diesel and Kerosene prices is creating a situation of revolt in the country. It is the intellectual bankruptcy of the Finance Ministry to do this. It is also anti national . Financing Budget deficit by raising these prices is sheer incompetence
— Subramanian Swamy (@Swamy39) April 5, 2022
स्वामी यांनी आज सकाळी ट्विटरवरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याअंतर्गत येणाऱ्या अर्थमंत्रालयावर थेट शब्दांमध्ये ट्विटरवरुन निशाणा साधलाय. स्वामी यांनी ट्विटरवरुन इंधनदरवाढीमुळे देशामध्ये अराजक माजेल अशी भीती व्यक्त केलीय. “रोज पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे देशात उठाव निर्माण होण्यासारखी परिस्थिती तयार होत आहे,” असे स्वामी म्हणाले आहेत.
तसेच पुढे बोलताना अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अर्थमंत्रालय जबाबदार असून त्यांच्या वैचारिक दारिद्रयामुळेच हे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. “असं करणं हे अर्थमंत्रालयाचं वैचारिक दारिद्रय आहे. तसेच हा देशद्रोह आहे,” असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे “अर्थसंकल्पातील तूट ही अशापद्धतीने दरवाढ करुन भरुन काढणे हे आर्थिक परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचं लक्षण आहे,” असा टोला स्वामींनी लगावला आहे.