मुंबई – इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत केंद्र सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे. आपण सगळ्यांनी सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करावा म्हणून ही दरवाढ केली जाते आहे, अशा आशयाची टिप्पणी त्यांनी केली आहे.
एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचे ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतो आहे. हे केंद्राच्याही लक्षात आले आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढे वाढले, डिझेलचे भाव तेवढे झाले. मात्र हे तसे नाही.
हे आपल्या भल्यासाठीच होते आहे. मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असे म्हणता. पण मी खरे की खोटे बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासे झाले तर तुम्ही म्हणतात तसे प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.