नवी दिल्ली – इंधन कंपन्यांना पेट्रोल विक्रीत प्रति लिटरला सध्या दहा रुपयाचा फायदा होत आहे. मात्र या अगोदर झालेला तोटा जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत इंधन कंपन्या पेट्रोलच्या किमती कमी करण्याची शक्यता कमी आहे असे बोलले जात आहे. 24 जून 2022 दरम्यान जागतिक बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या होत्या.
त्यावेळी पेट्रोल कंपन्यांना पेट्रोल विक्रीत प्रति लिटरला 17 रुपये 40 पैशाचा तर डिझेल विक्रीत प्रति लिटरला 27 रुपये 70 पैशाचा तोटा होत होता. त्यानंतरही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती होती. मात्र आता डिसेंबर अखेरीस या कंपन्यांना पेट्रोल विक्रीत प्रति लिटरला दहा रुपयाचा फायदा होत आहे. असे असले तरी इंधन कंपन्यांना अजूनही डिझेल विक्रीत प्रति लिटरला साडेसहा रुपयांचा तोटा होत आहे.
जोपर्यंत हा तोटा भरून निघत नाही तोपर्यंत या कंपन्या पेट्रोलच्या किंवा इतर इंधनाच्या किमती कमी करण्याची शक्यता नसल्याचे बोलले जाते. एप्रिल 2022 पासून इंधन कंपन्यांनी पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. एकेकाळी खनिज तेलाचे दर 116 डॉलरपर्यंत वाढले होते. ते आता 78 डॉलर प्रति पिंप या पातळीवर आले आहेत. सध्या फक्त पेट्रोलमध्ये कंपन्यांना फायदा होत आहे. इतर इंधनामध्ये कमी- अधिक प्रमाणात तोटा होत आहे. जोपर्यंत संपूर्ण तोटा भरून निघत नाही, तोपर्यंत कंपन्या आपण होऊन कोणत्याही इंधनाच्या दरात कपात करण्याची शक्यता कमी आहे.
स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती जागतिक पातळीवर जास्त असताना देशातील ग्राहकांना गॅस कमी किमतीत मिळत आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने 22 हजार कोटी रुपयांची अनुदान दिले आहे. तरीही एप्रिल- सप्टेंबर दरम्यान भारतातील तेल कंपन्यांना 21,201 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आता जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती कमी होत असल्यामुळे ऑक्टोबर- डिसेंबर या तिमाहीत या कंपन्यांना बऱ्यापैकी नफा होण्याची शक्यता आहे.
दर स्थिर का?
जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती जास्त असूनही भारतातील इंधन कंपन्यानी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून बदल केलेला नाही. कारण महागाई अगोदरच वाढली असताना इंधनाच्या किमती वाढविल्यानंतर महागाई आणखी वाढेल असे या इंधन कंपन्यांना वाटते. जागतिक परिस्थितीत आगामी काळात कसलाही बदल होणार नाही. त्यामुळे इंधन कंपन्यांच्या ताळेबंदावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.