पुणे – मार्केट यार्डात फळांना मागणी आहे. त्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई, लिंबू, सिताफळ, संत्रीच्या भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कलिंगडच्या भावात किलोमागे 3 रुपये, खरबूज, पपईच्या भावात प्रत्येकी 5 रुपये, सीताफळाच्या भावात 20 रुपये आणि लिंबाच्या गोणीमागे 50 रुपयांनी, तर संत्रीच्या भावातही 10 टक्क्यांनी वाढ झाली.
तर, मागणीअभावी डाळिंबाच्या भावात 5 टक्क्यांनी घट झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 1 ट्रक, मोसंबी 70 ते 80 टन, संत्री 4 टन, डाळिंब 100 ते 150 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, सीताफळ 8 ते 10 टन, खरबुजाचे 15 ते 20 टेम्पो, चिकू 500 बॉक्स इतकी आवक झाली.