पुणे : मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग आजपासून नियमितपणे सुरू झाले आहे. बाजारात 8 हजार 200 क्विंटल शेतीमालाची आवक झाली असून, ही आवक नेहमीच्या तुलनेत 30 टक्केच असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. दरम्यान येत्या चार ते पाच दिवसात बाजार आणि बाजारातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 दिवस बंद ठेवल्यानंतर 31 मे पासून तीनही विभाग सुरू झाले. सुरूवातीला एक दिवसाआड व्यवहार करण्याची अटक आडत्यांना घालण्यात आली होती. त्यानुसार बाजारात दररोज निम्मेच आडते असत. मात्र, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे यांच्याशी चर्चा केल्यानंतर नियमितपणे बाजार सुरू करणाचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला.
मुख्य बाजारात 232 वाहनांमधून शेतीमालाची आवक झाली. याचबरोबर मोशी उपबाजारात 151 वाहनांमधून 2 हजार 250 क्विंटल, मांजरी येथील उपबाजारात 120 गाड्यांमधून 665 क्विंटल आणि उत्तमनगर येथील उपबाजारात 14 गाड्यातून 70 क्विंटल शेतीमालाची आवक झाली. या आवकमुळे शहरातील फळ, भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. याविषयी प्रशासक देशमुख म्हणाले, मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवून बाजारातील व्यवहार सुरूळीतपणे सुरू आहेत. लवकरच आवक आणि खरेदी वाढून बाजार सुरळीत होईल.