आज बैठक : कारखाने आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवरही चर्चा
पुणे – अतिवृष्टीमुळे झालेले उसाचे नुकसान आणि त्यानंतर निवडणुकांमुळे लांबलेला गाळप हंगाम आता लवकरच सुरू होणार असला, तरी अजून “एफआरपी’ अर्थात उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीची रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. शिवाय कारखाने आणि शेतकरी यांच्यातील काही अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करुन निश्चित धोरणासाठी राज्यपालांनी बैठक बोलावली आहे.
राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे सर्व निर्णय राजभवन येथून होत आहेत. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम येत्या दि.1 डिसेंबरपासून सुरू होत आहे, पण “एफआरपी’ निश्चित झालेली नाही. “आम्हाला विचारात घेतल्याशिवाय “एफआरपी’ ठरवू नये,’ असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे.
अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूरमधील ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा गाळपासाठी ऊस फार कमी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींची चर्चा या बैठकीत होणार आहे. ही बैठक मंगळवारी मुंबईत राजभवन येथे होणार आहे. या बैठकीला कृषी खात्याचे सचिव, साखर आयुक्त आणि कारखानदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यातील उसाची परिस्थिती काय आहे, त्यानुसार यंदा साखर उत्पादनाचे किती उद्दिष्ट ठेवावे लागेल, “एफआरपी’ किती मिळाली पाहिजे याबाबत चर्चा होणार आहे.
वाढीव “एफआरपी’ मिळणार का?
गेल्या वर्षी 3,200 रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे यंदा त्यापेक्षा जास्त दर असावा अशी मागणी होत आहे. याशिवाय गेल्या वर्षी विक्रमी उत्पादन झाल्याने कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर साखरेचा साठा शिल्लक आहे. त्याबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही.