नागपूर- राज्यातील अनेक सारख कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपी दिलेली नाही. ते कारखाने कारवाईस पात्र असून त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आजपासून विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा सुरु केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून चारा आणि पाण्यासाठी जनावरं त्रस्त आहेत. पाण्यासाठी गावाकडील महिलांना वणवण भटकावे लागत असताना राज्यातील मंत्री केवळ दुष्काळी पर्यटन करीत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
ईव्हीएमबाबत संशय कायम
लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य केला असला तरी ईव्हीएमबाबत खूप काही घटना संशय निर्माण करणाऱ्या असून या शंका दूर करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला पराभूत करण्यासाठी समविचारी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. यापूर्वी सुद्धा विरोधकांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले होते. पुढेही प्रयत्न करणार असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. शिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील सोबत येण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.
राज्यातील मतदान संपल्यावर दुष्काळाविषयक उपाययोजना तात्काळ सुरु करणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारने याबाबतही तत्परता दाखवली नाही. तर केंद्र सरकारचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटले परंतु परिणामकारक उपाययोजना करण्यात आली नाही. त्याउटल दुष्काळ विषयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. मात्र तरीही प्रशासनाच्या दमनशाहीला न घाबरता येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरणार असल्याचे शेट्टींनी यावेळी सांगितले.
दरम्यान, यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या साखर कारखान्यांनी एफआरपी देण्यासंदर्भात टाळाटाळ केली होती. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारत अनेक कारखान्यांवर कारवाई घडवून आणली होती. भविष्यात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच धोरण राबवेल, असे राजू शेट्टी म्हणाले. तसेच साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साखरेचे बफर स्टॉक करावे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.