सतत प्रयत्न करूनही एकदाच यश : खलबतानंतर जगताप यांच्या गळ्यात आघाडीची माळ
मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी आघाडीचे नेते एकवटले
नगर – नगर लोकसभा मतदारसंघ हा तसा गेल्या काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्लाच झाला आहे. हा बालेकिल्ला जिंकून घेण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने सातत्याने टकरा दिल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत तर आघाडी नियोजनबद्धपणे उतरलेली पाहायला मिळते. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीने काहीही करून नगर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले.
गेल्या दोन निवडणुकांत खासदार दिलीप गांधी हे या मतदार संघात मोठ्या फरकाने निवडून आले. सन 1999 मध्ये खा. गांधी पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 2004 मध्ये खा. गांधी यांना डावलून भाजपने प्रा.ना.स फरांदे यांना उमेदवारी दिली. परंतू या निवडणुकीत फरांदे याचा पराभव झाला. खा. गांधी यांना उमेदवारी दिली नाही. त्याचा परिणाम या निवडणुकीत झाला. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत पुन्हा खा. गांधी यांना उमेदवारी दिली. त्यावेळी आघाडीने तगडा उमेदवार दिला होता.
तरी आघाडीला पराभवला समोरे जावे लागले. हा पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. 2014 मध्ये तर देशात मोदी लाट होती. असे असतांनाही कॉंग्रेस राष्ट्रवादीने प्रभावी व अभ्यास उमेदवार देवून भाजपच्या खा. गांधी यांची कोंडी केली होती. परंतू त्यात आघाडीला यश आले नाही. अखेर भाजपचे खा. गांधीच विजय झाले. सलग तीन वेळा आघाडीचा पराभव या मतदार संघात झाला आहे. वारवार टकरा मारूनही आघाडीला यश मिळाले नाही. 2004 चा अपवाद वगळता भाजपने या मतदारात आघाडीवर मात केली आहे. त्यामुळे सध्या तरी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्लाच झाला आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला कधी भाजपमय झाला हे आघाडीला कळलेच नाही. आता मात्र हा मतदारसंघ पुन्हा आघाडीच्या ताब्यात आणण्यासाठी आघाडीचे नेते एकवटले आहेत. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांची मोट बांधत आहेत. अर्थात त्या आघाडीला किती यश मिळणार हे आता निकालानंतर स्पष्ट होईल.