नगर- दि.22 (प्रतिनिधी) -महाराष्ट्र राज्य ग्रामपंचातय कर्मचारी महासंघ आयटकच्यावतीने राज्यातील सर्व र्मचाऱ्यांचा मोर्चा मुंबई येथे दि.26 जून रोजी आयोजित केला असून, सकाळी 11 वाजले पासून ते मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदान येथे सत्यग्राह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.सुधीर टोकेकर व जिल्हा अध्यक्ष कॉ.ऍड.सुभाष लांडे, कार्याध्यक्ष संदिप आल्हाट यांनी दिली.
सन 2013 ला शासनाच्या उर्जा, उद्योग व कामगार खात्याने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी किमान वेतन जाहीर केले होते. त्यावेळी 5100 ते 7100 असे वेतन केले होते. सदन वेतनश्रेणीची मुदत 2018 ला संपलेली असतांनाही वेतन श्रेणी जाहीर केली नाही, परंतु ती 28 मे 2019 ला जाहीर केली व यामध्ये केवळ 3 हजार पर्यंत वाढ सुचविलेली आहे. संघटनेने ही वाढ 18,000 हजार पर्यंत सुचविली होती, मात्र ती मान्य केली नाही, किमान 5000 हजार ते 8000 हजार रुपये वाढ श्रेणी नुसार मिळाली पाहिजे, यासाठी व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा असून, म्हैसकर कमेटीनुसार पेन्शन सुरु करा.
ऑनलाईन आकृती बंध कर्मचारी यांचा पगारासाठी शासनाने 90 टक्के कर वसुलीची अट लावली आहे, ही करवसुली न केल्यास कर्मचाऱ्यांचा पगार कपात केला जातो, त्यामुळे ही जाचक अट रद्द झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसह उपदानासाठी 10 कर्मचारी अट आहे ती रद्द करुन, प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यांना उपदानाऐवजी अनुदान म्हणून 1 लाख रुपये द्या, प्रॉव्हींडंट फंड 8.33 ऐवजी 10 टक्के कपात करावी. पाणी पुरवठा कर्मचारी यांना आठवड्याची सुटी मिळाली पाहिजे, सेवापुस्तक भरलेच पाहिजे, प्राव्ह.फंडाचे पुस्तक उघडून रक्कम भरलीच पाहिजे, यासाठी हा मोर्चा असून, राज्यातून 10 हजार ग्रामपंचायत कर्मचारी या मोर्चात सहभागी होतील, असे राज्य सेक्रेटरी कॉ.नामदेवराव चव्हाण, अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांनी माहिती दिली.
ज्या ग्रामपंचायत सदस्यांना या मोर्चात यायचे आहे, त्यांनी मंगळवार दि.25 जून रोजी सायं.5 वा. रेल्वे स्टेशन येथे हजर रहावे. सायं.6.25 ची शिर्डी-मुंबई सुपर फास्ट पॅसेजर आहे. नगर जिल्ह्यातून या मोर्चासाठी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित रहावे, असे आवाहन संजय डमाळ, सुनिल शिंदे, मारुती सावंत, रावसाहेब शेलार, प्रशांत उपाध्ये, शरद खोडदे, संजय शेलार, राहुल पोळ, सुरेश कोकाटे, उत्तम करारे, अरुण राऊत, भाऊसाहेब गिरवले, संतोष आल्हाट, संतोष म्हसे, उगलमुगले, एकनाथ वखरे यांनी केले आहे.