कोल्हापूर: साहित्यिक त्याच्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून आभासी दुनियेच्या पलिकडल्या वास्तवाची जाणीव वाचकाला करून देत असतो. जुगाड आणि श्वासोच्छवासाच्या मध्यंतरातील कविता या दोन्ही साहित्यकृती त्या वास्तवाशी नाते सांगणाऱ्या आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत साजरा करण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-2020 या कार्यक्रमाचे औचित्य साधून जुगाड (द्वितीय आवृत्ती) आणि श्वासोच्छवासाच्या मध्यंतरातील कविता या पुस्तकांचा एकत्रित प्रकाशन सोहळा आज भौतिकशास्त्र अधिविभाग सभागृहात झाला.
त्यावेळी सप्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे होते. यावेळी राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य आण्णासाहेब खेमनर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. सप्रे म्हणाले, जुगाड या ग्रंथामधून सामाजिक सद्यस्थितीची जाणीव होते. काही काळ मनाला स्तब्ध, अस्वस्थ करणारी ही कलाकृती आहे. श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातील कविता ही सुद्धा वाचकाला त्याच्या मुळाशी जोडून ठेवत असतानाच जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनुभवास येणाऱ्या सामाजिक, मानसिक आंदोलनांची जाणीव करून देते.
प्राचार्य आण्णासाहेब खेमनर म्हणाले, माणसाकडे साहित्यरूपी वेड, आवड आणि सामाजिक भान असल्यास दर्जेदार साहित्याची निर्मिती होत असते. नव्या पिढीला निश्चितपणे प्रेरणा देणारी आणि साहित्यिक भरण-पोषण करणारे कार्य या दोन्ही पुस्तकांमुळे होणार आहे.
अध्यक्षीय मनोगतात डॉ.रणधीर शिंदे म्हणाले, मराठी साहित्य लेखनासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या शाखेची आवश्यकता नसते. अनेक मोठे साहित्यिक या परिसरामधील आहेत, हे कोल्हापूरचे वैभव आहे. अतिशय संवेदनशीलपणे मांडणी करणारे आणि साक्षेपी वेध घेणारे कांदबरीकार निर्माण होत आहेत, हे चांगले द्योतक आहे.
यावेळी कादंबरीकार किरण गुरव आणि कवी डॉ.रघुनाथ कडाकणे आणि गौरावती खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरूवातीला किरण गुरव यांच्या जुगाड (द्वितीय अवृत्ती)चे आणि डॉ.रघुनाथ कडाकणे यांच्या श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातील कविता या ग्रंथांचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक अविनाथ सप्रे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ.नंदकुमार मोरे यांनी केला, तर आभार राजेश पाटील यांनी मानले. यावेळी घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.