हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि या शतकाचा महानायक म्हणून गौरव झालेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिनेते अभिषेक यांना करोना विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाल्याने देशभर चिंतेचे वातावरण असले तरी एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे की, करोनाविषाणूने महानायकपासून महासामान्यांपर्यंत सर्वांनाच बाधित केले आहे. त्यामध्ये कोणताही भेदभाव झालेला नाही.
अमिताभ बच्चन यांनी स्वतःहून ट्विट करून आपण करोना विषाणू पासून बाधित झाल्याची माहिती दिल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या असोत किंवा विविध माध्यमे असोत त्यावर अमिताभ यांच्या या आजारांची चर्चा सुरू आहे. खूप वर्षांपूर्वी “कुली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मारामारीचे शूटिंग सुरू असताना अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते आणि दीर्घकाळ रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील त्यांच्या चाहत्यांनी ज्या प्रकारे चिंता व्यक्त केली होती आणि अमिताभ बच्चन बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली होती त्याच प्रकारच्या प्रार्थना आताही सुरू झाल्या आहेत.
ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्या सारख्या राजकारणातील नेत्यांपासून सचिन तेंडुलकर सारख्या क्रीडापटूपर्यंत सर्वांनीच अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्या आहेत. स्वतः अमिताभ यांनी नानावटी रुग्णालयातून एक व्हिडिओ प्रसारित करून आपल्यावर चांगले उपचार होत असल्याची माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन हे देशातील खूप मोठे नाव असल्याने सर्वांनीच त्याची दखल घेणे साहजिकच आहे; पण या महानायकाच्या आजाराची दखल घेत असतानाच देशाच्या कानाकोपऱ्यात अतिसामान्य नागरिकांना या करोना विषाणूचा जो जबरदस्त विळखा बसलेला आहे त्याबाबतही तेवढेच गांभीर्य दाखवून पावले उचलण्याची गरज या निमित्ताने समोर येत आहे.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यावर लगेचच महागड्या रुग्णालयात उपचार सुरू झाले; पण देशातील अनेक शहरांमध्ये सरकारी रुग्णालयं आता करोना रुग्णांमध्ये फुल झाल्यामुळे रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत जे सामान्यांना परवडणारे नाहीत त्याचाही विचार व्हायला हवा. गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये देशातील काही राजकीय नेत्यांनाही या विषाणूची बाधा झाली.
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांनाही या विषाणूने ग्रासले होते. योग्य उपचार झाल्यामुळे त्यातून ते बाहेर आले. अर्थात, नांदेडच्या अशोक चव्हाण यांना उपचारासाठी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे यावे लागले आणि धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतच उपचार करावे लागले. म्हणजेच देशाच्या किंवा राज्याच्या ग्रामीण भागामध्ये सक्षम आरोग्य सेवा किंवा आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही, असाच निष्कर्ष दुर्दैवाने काढावा लागतो.
महानायक अमिताभ बच्चन असो किंवा विविध राजकारणी नेते असो त्यांना या आजाराची बाधा झाल्यानंतर त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाणे साहजिकच आहे; पण त्याच वेळी या महानायकाला किंवा या राजकीय नेत्यांना मोठे करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा बाळगण्यात चूक आहे, असे वाटत नाही.
करोना महासंकटामुळे निर्माण झालेली देशातील रुग्णांची संख्या आणि देशातील विद्यमान आरोग्य यंत्रणा, यांचे प्रमाण विषम असल्याने आरोग्य यंत्रणेवर काही प्रमाणात ताण पडणार हे उघड आहे. त्या परिस्थितीत आणि उपलब्ध यंत्रणांचा वापर करून आरोग्य सेवक चांगले काम करीत आहेत याबाबत कोणतेच दुमत नाही; पण तरीही या परिस्थितीचा फायदा घेण्याचेही काम काहीजण करत आहेत, हेही नाकारून चालणार नाही.
करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे आणि इंजेक्शन्स यांचा काळाबाजार होत असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या. खासगी रुग्णालये या निमित्ताने रुग्णाच्या नातेवाईकांची लूट करत असल्याचे समोर येत आहे. देशातील अभिनेते किंवा राजकारणी यांना या परिस्थितीची जाणीव असण्याचे कोणतेच कारण नाही; पण यानिमित्ताने एकीकडे महानायक आणि दुसरीकडे महासामान्य नागरिक यांच्या परिस्थितीतील फरक निश्चितच समोर आला आहे.
काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचेही डेंग्यू सारख्या आजाराने निधन झाले होते, तेव्हाही आजार कोणताही भेदभाव करत नाही, ही गोष्ट समोर आली होती. यश चोप्रांच्या घरापर्यंत डेंग्यूचे डास पोहोचले म्हणून तेव्हा चर्चाही झाली होती. तशी चर्चा आता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या आजाराबाबत होत आहे. देशात करोनाच्या महासंकटाला प्रारंभ झाल्यापासूनच अमिताभ बच्चन जाणीपूर्वक या विषाणूच्या विरोधात जनजागृतीचे काम करत होते आणि स्वच्छता पाळण्याचे आवाहन करत होते.
तशीच सर्व प्रकारची दक्षता त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेऊनही त्यांच्यापर्यंत हा आजार पोहोचला आहे, ही गोष्टही समजून घेण्यासारखी आहे. करोना विषाणूचा प्रसार आजूबाजूला होत असताना बिनधास्तपणे कसेही फिरणारे आणि कसेही वावरणारे सामान्य नागरिक यापासून काही बोध घेतील अशी आशा करायला हवी. “कौन बनेगा करोडपती’ या गेम शो च्या जाहिरातीचे चित्रीकरण अमिताभ बच्चन यांनी घरातूनच केले होते. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये ते आपल्या घराच्या बाहेरही पडले नव्हते. तरीही त्यांच्या घरापर्यंत करोना विषाणू पोहोचला आहे, ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे.
देशातील लॉकडाऊन आणि प्रशासनाने केलेले विविध नियम यांना विरोध करणाऱ्या लोकांनी आता तरी शहाणे होण्याची गरज आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकाला करोना विषाणूमुळे झालेल्या आजाराचा खर्च परवडू शकतो; पण देशातील अतिसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरील हा खर्च आहे, हे लक्षात घेऊनच आपल्याला हा आजार होऊ नये याची दक्षता देशातील महासामान्य नागरिकांनी घ्यायला हवी, असाच संदेश महानायकाला झालेल्या या आजाराने निश्चितपणे दिलेला आहे.