मुंबई – सध्या देशासह राज्यात पुन्हा एकदा करोना विषाणूने आपलं डोकं वर काढत अक्षरशः थैमान घातले आहे. या गंभीर संकटावर मात करण्यासाठी साऱ्या देशानं एकत्र येऊन एकजुटीनं लढा देणं अपेक्षित होत. तिथंच चित्र काहीसं वेगळं असल्याचं दिसून येत आहे.
या संकट काळात सुद्धा अनेक राजकीय नेते, पक्ष आपली स्वतःची पोळी भाजून घेत आहे. कुठं रुग्णांच्या आकडेवारीत गोंधळ तर कुठं करोना लसीमध्ये राजकारण याच वृत्ती सामान्य जनतेला संताप देऊन जात आहे. जनतेनं जनतेच्याच सेवेसाठी म्हणून निवडून दिलेल्या या नेतेमंडळींच्या भूमिका आणि सध्या सुरु असणारी त्यांची राजकीय खेळी पाहून चित्रपट सृष्टीतून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मराठी सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय खेळीवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. “राजकारण म्हणजे एक भयाण कीड, असाच उल्लेख तिनं आपल्या पोस्टमधून केला.
“सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे ‘राजकारण’. ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडीपासून बचाव करता आला तर बघा…’ परिस्थिती नेमकी किती बिकट आहे हे सांगताना, ‘अवघड आहे सगळंच…. काळजी घ्या’ हे तिचे शब्द सर्वांनाच विचार करायला भाग पाडत आहेत.