श्रेयस तळपदे सध्या बॉलीवूडपासून दूर आहे. मात्र, सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो चर्चेत असतोच. अलीकडेच तो काही वाईट अनुभवांमुळे थोडा व्यथित झाला आहे. त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये मनातील खदखद व्यक्त केली.
“इक्बाल’व्यतिरिक्त त्याने फारच कमी सोलो हिरो असलेले सिनेमे केले आहेत. त्याचे कारणही त्याने सांगितले. आपल्यामध्ये स्वतःचे मार्केटिंग करण्याची क्षमता जरा मर्यादितच असल्याचे त्याला वाटते. त्याशिवाय काही कलाकारांना आपल्याबरोबर स्क्रीन शेअर करायला असुरक्षित वाटत असते.
म्हणूनच काही मित्रांनी त्यांच्या सिनेमात आपल्याला घेतले नाही. या मित्रांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मला मागे सोडून ते पुढे निघून गेले असल्याचेही त्याने सांगितले. फिल्म इंडस्ट्रीत कोणालाही वाईट दिवस येऊ शकतात. अमिताभ बच्चनदेखील याला अपवाद नाहीत. माझ्या बाबतीतही तसेच होते आहे. मी पूर्वी चांगले काम केले आहे.
मला अजूनही चांगले काम करायचे आहे. जर आपण चांगल्या कामाची अपेक्षा केली, तरच आपल्या हातून चांगले काम होऊ शकते. मला चांगले काम करत करतच जगाचा निरोप घ्यायचा आहे, असे तो म्हणाला. मात्र, पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मित्रांविषयी त्याने कोणताही तपशील दिला नाही.