मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात मित्रांमधील वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मित्रांनीच आपल्या मित्राला त्याच्या वाढदिवशी ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पंतनगर परिसरात हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश सावंत असे ठार करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नितेश आपल्या मित्रांसोबत एका पार्कमध्ये आपला वाढदिवस साजरा करत होता. याचदरम्यान त्याठिकाणी 7 ते 8 जणांच्या टोळक्यांनी येवून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे सर्व जण फरार झाले आहेत. या हल्ल्यात नितेश गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी नितेशला तातडीनं जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काही दिवसांपुर्वी नितेश आणि त्याच्या मित्रांचे एका कारणावरून वाद झाले होते, याचाच बदला घेण्यासाठी या टोळक्यांनी नितेशला ठार केले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.