नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधातील तपासाच्या नावाखाली त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याची टीका चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. चिदंबरम यांना लिहीलेल्या पत्रामध्ये कार्ती यांनी ही सरकारबाबतची तक्रार व्यक्त केली आहे. चिदंबरम हे मंत्री असताना त्यांच्या हाताखालील 12 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आपल्या वडीलांना जबाबदार धरले जात आहे, अशी खंतही कार्ती चिदंबरम यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. हे पत्र कार्ती चिदंबरम यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.
महिन्याभरापूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घराच्या भिंती ओलांडून कधीही न संपणाऱ्या तपासाच्या नावाखाली माझ्या वडिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. सामाजिक समुदायाने याबाबत बाळगलेले मौन आश्चर्य वाटावे असे आहे. या काळात खरे मित्र कोण हे आता उघड झाले आहे. त्याबद्दल खरोखर धन्यवाद. न्याय आणि सत्य निश्चितच उघड होईल, असे कार्ती चिदंबरम यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
वडील पी. चिदंबरम, फारुख अब्दुल्ला आणि डी.के. शिवकुमार यांना झालेली अटक केवळ एक मोठ्या यादीची सुरुवात आहे, असेही कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे. पी. चिदंबरम यांना 21 जुलै रोजी अटक करण्यात आली आणि ते सध्या तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. “आयएनएक्स मिडीया’ला विदेशी अर्थसहाय्य मिळण्याबाबत “फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’मध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.