पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम 20 ते 25 टक्क्यांनी होणार कमी
कामकाज अंतिम टप्प्यात
पुणे – राज्यात करोना संसर्गासोबतच लॉकडाऊनही वाढत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी शाळा मात्र बंद आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम 20 ते 25 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने याबाबत सविस्तर अहवाल तयार करून तो शालेय शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
करोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत. बहुसंख्य शाळांनी आपापल्या ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडून छपाई झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटपही विद्यार्थ्यांना केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे शैक्षणिक कॅलेंडरही प्रसिद्ध केले आहे. वेबसाइटवर सर्व शाळांसाठी ते उपलब्ध करून दिले आहे. यावर्षी शैक्षणिक सत्राचा कालावधीही कमी होण्याची शक्यता आहे.
अभ्यास मंडळातील विषय तज्ज्ञांमार्फत इयत्ता आणि विषय निहाय अभ्यासक्रम कमी करण्याबाबतचे कामकाज गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. अभ्यासक्रम कमी करण्यावरून कोणताही वादविवाद निर्माण होऊ नये याची खबरदारीही विषय तज्ज्ञांकडून बाळगण्यात येत आहे. काही विषय तज्ज्ञांनी आपापले अहवाल तयार करून ते ई-मेलद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पाठवले आहेत. काही जणांचे अहवाल सादर होणे बाकी आहे. दोन-तीन दिवसांत सर्व अहवाल येतील. त्यानंतर सर्व अहवाल एकत्रित करण्यात येणार आहेत.
राज्य शासनाच्या अंतिम मंजूरीसाठी ते पाठवण्यात येणार आहे. शासनाने अहवालावर निर्णय घेतल्यानंतरच अभ्यासक्रम कमी करण्याबाबतची अंमलबजावणी होणार आहे. अभ्यासक्रम कमी केल्याबाबतची माहिती शाळा, विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.