बदलत्या काळात अनेक स्त्रिया स्वतःच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी घेऊ लागल्या आहेत ही निश्चितच सकारात्मक गोष्टी म्हणावी लागेल. शिक्षणाचा प्रसार आणि नोकरी-व्यवसायामुळे मिळालेले आर्थिक स्वावलंबन यामुळे गेल्या दशकात अशा स्त्रियांची संख्या अनेक पटींनी वाढली. अर्थात आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्य यामध्ये गोंधळ करून चालणार नाही. आर्थिक स्वावलंबन म्हणजे सध्याच्या काळात तुम्ही तुमच्या वैयक्तिक खर्चाची काळजी नाही. व्यक्ती आर्थिक विवंचनेतून स्वतंत्र केव्हा होते? जेव्हा तुम्ही पूर्ण हयातीत अगदी निवृत्तीनंतरही इच्छित जीवनशैलीनुसार जगू शकता आणि त्यासाठी तुम्ही गुंतवणुकीतून निर्माण केलेली पूंजी पुरेशी ठरणार असते. अर्थात तुम्ही नोकरी-व्यवसाय करत आहात आणि नियमित प्राप्ती सुरु आहे म्हणून हे सगळे आपोआप घडून येणार नसते. त्यासाठी काही विचार, नियोजन आणि त्याला निश्चित कृतीची जोड आवश्यक असते. हे सगळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांसाठी अधिक आव्हानात्मक असते.
काही जणींच्या आणि अगदी जणांच्या देखील मनात प्रश्न येईल स्त्रीला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी स्वतंत्र नियोजनाची काय गरज आहे? कौटुंबिक नियोजनात तिचा समावेश असतोच. होय, पती-पत्नीने मिळून निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी पुरेशी रक्कम जमा केली असली आणि त्यातून दोधे शांत आणि आनंदी आयुष्य जगू शकणार असलात तरी स्त्रीसाठी वेगळा नियोजन आराखडा असणे अतिशय आवश्यक असतो.
आर्थिक स्वावलंबनातून स्वातंत्र्याकडे… (भाग-२)
अनेकदा घटस्फोटासारख्या घटनांमुळे एकत्रित नियोजन वाऱ्यासारखे उडून जाते आणि स्त्रीच्या हाती काहीच उरत नाही. पतीचे निधन झाल्यावर अनेक कुटुंबात त्याच्या सगळ्या पैशाचे नियंत्रण वेगळ्याच व्यक्तीच्या हातात जाते. अशावेळी नेमके काय करावे असा मोठा प्रश्न स्त्रीसमोर उभा राहतो. त्याखेरीज आपल्याकडील अनेक सामाजिक प्रथा, रुढी पाहता स्त्रीने निवृत्तीनंतरच्या जीवनाचे आधीपासून स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक ठरते. याखेरीज सहसा विचार केला जात नाही अशा अनेक बारीकसारीक वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टींमुळे स्त्रीने नियोजन करणे गरजेचे ठरते.
– चतुर