स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे आपल्यातल्या किती जणांना माहीत असते? स्वातंत्र्य हवे असेल तर निर्णयाची जबाबदारीही घ्यावी लागते याचे भान किती जणांना असते? स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची गोष्ट नाही तर ती मनाची एक अवस्था आहे हे आपल्याला माहीत असते का? आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांचे आपल्यावरचे नियंत्रण त्या दिवशी अधिकृतपणे संपले. आपण आपली स्वत:ची राज्यघटना तयार केली आणि नागरिकांना काही मूलभूत स्वातंत्र्ये दिली. विचार, अभिव्यक्ती, संचार, धार्मिक आचार अशा अनेक विषयांमध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने नागरिकांना आपला विकास साधण्याची संधी निर्माण झाली. दुसऱ्याच्या नियंत्रणातून मुक्ती मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य असा राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ आहे. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थच मुळी आपल्याला हवे तसे विचार करण्याचा, बोलण्याचा आणि वागण्याचा हक्क आणि शक्ती असणे असा आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या ताब्यातून किंवा हस्तक्षेपातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य.
स्वतंत्र असणे ही एक मानसिक स्थिती आहे. स्वतंत्र मानसिकता म्हणजे आपला आपण विचार करून निर्णय घेणे, त्यांची आपल्या मनाप्रमाणे अंमलबजावणी करणे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण बांधील नाही, तसेच कोणालाही आपल्याला जाब द्यायचा नाही अशी स्थिती म्हणजे स्वातंत्र्य, ही व्यक्तिस्वातंत्र्याची आजची संकल्पना आहे. यातूनच व्यक्तिवादाचा जन्म होतो. पाश्चिमात्त्य संस्कृतीमध्ये या व्यक्तिवादाचा पुरस्कार झालेला आढळतो. पौर्वात्य संस्कृतीमध्ये मात्र एका माणसाच्या स्वातंत्र्यापेक्षा समूहाचा, गटाचा, समाजाचा विचार केला जातो आणि परस्परावलंबित्वाला महत्त्व दिले जाते. लहान मुलाची वाढ होताना त्याचा स्वाभाविकपणे स्वतंत्र विचार आणि आचाराच्या दिशेने प्रवास होतो. कुमारवयात मुलांची विचारक्षमता वाढते. अमूर्त संकल्पना समजू लागतात. तसेच याच वयात स्वत:च्या आयुष्यातले काही महत्त्वाचे निर्णय उदा. शिक्षण, करिअर इ. घेण्याची त्यांच्यावर वेळ येते. यातून मुले स्वतंत्रपणे विचार करायला आणि निर्णय करायला लागतात. तसे जमले तर त्याला स्वत:ची ओळख प्राप्त होते, आत्मविश्वास वाढतो आणि जगाला सामोरे जाण्याचे बळ येते. आईवडिलांवर सतत अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.
निर्णय करणे, त्यावर कार्यवाही करणे याचे स्वातंत्र्य असणे याची दुसरी बाजू म्हणजे योग्य निर्णय करणे, आपल्या जीवनमूल्यांचा विचार करून निर्णय करणे होय. म्हणजेच हे स्वातंत्र्य अर्निबंध नाही, तर जबाबदारीचे आहे. स्वनियंत्रण आणि जबाबदारीची जाणीव यातून नैतिक आणि कायदेशीर बंधने तयार होतात आणि ती स्वीकारलीही जातात. योग्य निर्णय करताना आपल्या परिस्थितीचा विचार करावा लागतो, आपल्या कुटुंबाचा, नातेसंबंधांचा विचार करावा लागतो. म्हणजेच एकीकडे काही बंधने येतात. नोकरी परगावी करू की नको, मग माझ्या म्हाताऱ्या आई-बाबांकडे कोण पाहील, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरीही चांगली संधी आहे म्हणून नोकरी स्वीकारायचे ठरवले तर, जबाबदार व्यक्ती आई-वडिलांची सोय करून जाते, तसेच सतत संपर्कात राहते. एखादा निर्णय चुकला तर त्याचीही जबाबदारी घेणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. स्वातंत्र्य उपभोगताना जबाबदारी टाळली तर त्यातून अपराधीपणाची भावना निर्माण होते, मनात राग निर्माण होतो, निराशा येते. माझे विचार व्यक्त करण्याचे मला स्वातंत्र्य आहे असे म्हणत सोशल मीडियावर अनेक मते मांडली जातात. त्या वेळेस कधी कधी माहिती तपासून घेणे, भाषेवर ताबा ठेवणे, अफवा न पसरवणे अशा अनेक जबाबदाऱ्या टाळल्या आहेत असे लक्षात येते.
विविध प्रकारची माहिती, मतप्रवाह आज आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. आपल्याला निर्णयस्वातंत्र्य आहे. योग्य, अयोग्य काय हे ठरवण्याचे, विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, तशीच विचार करणे ही जबाबदारी आहे. त्या जबाबदारीपासून दूर पळाले की प्रचार प्रसाराला बळी पडण्याची शक्यता वाढते. अतिरेकी विचारसरणीला अनुयायी यातून मिळतात. त्या विचारसरणीसाठी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतात. मिळालेल्या स्वातंत्र्याचा असाही उपयोग केला जातो. “माझा मी स्वतंत्र आहे.’ याचा अर्थ मी एकटा आहे असा होत जातो. कौटुंबिक, सामाजिक कोणत्याच बंधनांमध्ये अडकायचे नाही असे मानणारा सगळ्यांपासून दूर जातो आणि त्याला लवकर निराशा येते. तारुण्यातच अतिचिंता, उदासीनता, व्यसनाधीनता असे अनेक मानसिक विकार होतात. कधी कधी आत्महत्याही केली जाते.
स्वातंत्र्य मानसिक आरोग्याशी निगडित आहे. स्वतंत्र व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असते. निवडीचे स्वातंत्र्य असेल तर आयुष्याची गुणवत्ता वाढते. आपल्या विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते. शिक्षण, करिअर, लग्न, घर, नोकरी, व्यवसाय प्रत्येक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला प्रगतिपथावर नेते. आज प्रत्येक क्षेत्रात निवड करण्यासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत. समजा बाजारात स्मार्ट फोन घ्यायला गेले तर आज अनेक प्रकार उपलब्ध आहेत. निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे असे वाटते की खरेदीतही खूप समाधान मिळेल. पण जितक्या अधिक वस्तू उपलब्ध तितका मनाचा गोंधळ जास्त. मग खरेदी केल्यावर वाटत राहते, “तो दुसरा फोन याच्यापेक्षा जास्त चांगला होता. मी तो का नाही घेतला?’ कधी कधी खरेदी करतानाच अनिश्चितता वाटत राहते आणि कोणता फोन घेऊ हे ठरवणेच अशक्य बनते. घरी आल्यावर वाटते “अरे त्या दुसऱ्या कंपनीचा फोन घ्यायला हवा होता. एक चांगली संधी गेली.’ आपल्याकडे सगळे उत्तम प्रतीचे हवे असे वाटणाऱ्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत. या सगळ्यातून स्वत:लाच दोष दिला जातो. मन समाधानी होऊ शकत नाही आणि खरेदीतला आनंद संपून जातो.
स्वातंत्र्याच्या अतिरेकातून उपभोगवाद निर्माण होतो. हवे तसे वागण्याचा मला अधिकार आहे, अशी समजूत होते. यातून नैतिक मूल्ये, कायदेशीर बंधने, समाजाच्या आणि कुटुंबाच्या मर्यादा कशाचेही भान राहत नाही. स्वैराचार वाढतो. गुन्हेगारी आणि समाजविघातक वृत्ती बळावतात. मुक्ती ही बंधनापासून असते, अन्याय अत्याचारापासून असते, गुलामगिरीपासून असते. स्वातंत्र्य हे एक चांगले आयुष्य जगण्यासाठी असते. हे स्वातंत्र्य आपल्या सुदैवाने आपल्याला आज आहे. त्याचा योग्य उपयोग करणे आपल्या हातात आहे.
प्रा. भगवान गावित