मलवडी – माण व खटाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी माणचा दौरा केला असता, लोकांनी त्यांना पाणी पुरेसे मिळत नाही अस सांगून, तुम्ही अधिक पाणी उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली होती. लोकांची अडचण बघून माण-खटावमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी दिली.
दहिवडी येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनील पोळ, युवा नेते मनोज पोळ, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत विरकर आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, माण-खटावमध्ये चारा व पाण्याची मोठी टंचाई जाणवत असल्यामुळे, शासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. पण या उपाययोजना पुरेशा नाहीत. माण-खटावमधील लोकांची मागणी व गाव पातळी वर असलेली परिस्थिती पाहून, भारत फोर्ज व बारामती ऍग्रो यांच्या मदतीने पाणी उपलब्ध करण्याचं ठरवण्यात आले. माझ्या नियोजनाखाली माण व खटाव चे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याशी चर्चा करून पाणी वाटपाचा आराखडा तयार केला.
आज अखेर माणमध्ये 66 खेपांच्या माध्यमातून 89 गावांमधील 217169 एवढ्या लोकसंखेला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर खटावमध्ये 21 खेपांच्या माध्यमातून 33 गावांमधील 1,34,391 एवढ्या लोकसंखेला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.