पॉझिटिव्ह रुग्णाला सोसायटी सभासदांकडून घरभेटीद्वारे “गेट वेल सून’
क्वारंटाइनचा शिक्का घेऊन गावभर फेरफटका
पुणे – क्वारंटाइन असलेले रस्त्यावर फिरतात आणि आरोग्य विभाग काहीच करू शकत नाही, अशी स्थिती शहरात झाली आहे. त्याचीच साक्ष लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी संचेती चौकातील ते 11 जण सापडल्याने पटली. ज्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का होता. ते बिनधास्त फिरत होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या किंवा कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच राहून उपचार करण्याला मुभा दिली आहे. मात्र, त्या रुग्णांकडून तसे हमीपत्र लिहून घेतले जात आहे. अशी सरकारने मुभा दिली असतानाही अनेकांनी त्याचा गैरफायदा घेण्याला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी एका गाडीमध्ये 11 जण सापडले. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन असे शिक्के होते. हे बिहारमधून आलेले मजूर होते. त्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला दिले होते.
तपासणी करताना प्रातिनिधिक स्वरूपात हे सापडले; परंतु असे कितीतरी क्वारंटाइन आपल्याला काही झाले नाही, लक्षणे नाहीत त्यामुळे धोका नाही, असा समज करून रस्त्यावरून फिरत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.
बाहेरील व्यक्ती, सफाई कामगार, घरकाम करणाऱ्यांना अनेक सोसायटींमध्ये येण्याला मज्जाव केला होता. मात्र, सोसायटींमध्ये एखादा पॉझिटिव्ह सापडला आणि त्याला होम क्वारंटाइन केले असेल, तर सोसायटीतील अन्य सभासद त्यांना “गेट वेल सून’ म्हणायला त्यांच्या घरी जाण्याचा प्रकार घडला.
आता या महाभागांना काय म्हणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या संबंधात अनेक सूचना सुरुवातीपासूनच जारी केल्या आहेत. अनेकांवर कारवाइही झाली आहे. परंतु प्रत्येक घरटी, प्रत्येक सोसायट्यांमध्ये अशाप्रकारचा वॉच ठेवणे प्रशासनाला शक्य नाही. संबंधित सोसायट्यांनी आणि त्यातील सभासदांनीच त्यांच्याकडे असे प्रकार घडत नाही ना, किंवा घडू नयेत यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
50ची परवानगी 500 जणांची उपस्थिती
औंध, बाणेर या भागांत बाधितांची संख्या वाढण्याचे आणखी एक कारण समारंभ साजरे करण्यासाठी झालेल्या गर्दीचे सांगण्यात येते. मेचा मुहूर्त चुकला आता जुलैमध्ये लग्न उरकून घेऊयात, 50 जणांची परवानगी मिळाली आहे. याचा गैरफायदा उठवत पन्नास तिथे पाचशे जणांना बोलावले आणि तेथेच अनेकांना बाधा झाल्याचा प्रकारही घडला आहे. वाढदिवस आणि अन्य समारंभात लागण झाल्याचे प्रकारही यातून पुढे आले आहेत. याशिवाय काही जणांनी खूप दिवसांत नातेवाईकांची भेट घेतली नाही, असे सांगून नातेवाईकांकडे जाण्याचा सपाटाच लावला. त्यामुळेही बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
महापालिका यासंदर्भात सुरुवातीपासूनच जागृती करत आहे. एकमेकांच्या संपर्कामुळे करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यामुळे बाधितांचा संपर्क टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे होम क्वारंटाइन असलेल्यांना भेटायला जाणे टाळा. त्यांच्या घरातील व्यक्तींनीही विलगीकरणातील व्यक्तीला दिलेल्या मुदतीत भेटणे टाळावे. ही खबरदारी नागरिकांनी स्वत: घेणेच आवश्यक आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, महापालिका