मर्यादित क्षेत्रांना नियम लागू : कंपन्यांचे योगदान कायम
पुणे – सध्या “ईपीएफ’ म्हणजे भविष्य निर्वाह निधीत कर्मचाऱ्यांचे योगदान मूळ पगाराच्या 12 टक्के असते. तर कंपनीचे योगदान 12 टक्के असते. मात्र, काही क्षेत्रांतील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे “ईपीएफ’मधील योगदान सध्याच्या 12 टक्केवरून 2 ते 3 टक्के घटविण्याचा पर्याय उपलब्ध केला जाणार आहे.
असे असले तरी कंपनीचे योगदान मात्र पूर्वीप्रमाणेच 12 टक्क्यांवर कायम ठेवण्यात येणार आहे. यामुळे कर्मचारी थोडासा जास्त पगार घरी घेऊन जाऊ शकतील. मात्र, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील एकूण रक्कमेमध्ये त्या प्रमाणात घट होऊ शकेल. या प्रस्तावावर सरकार गेल्या 5 वर्षांपासून विचार करीत होते.
मात्र, या ना त्या कारणामुळे हा प्रस्ताव मागे पडत गेला होता. सध्या चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सामाजिक सुरक्षा संहिता विधेयक मांडले जाणार आहे. त्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे “ईपीएफ’मधील योगदान 2 ते 3 टक्क्यांनी कमी करण्याचा पर्याय देण्याचा प्रस्ताव पुढे केला जाणार आहे.
या कंपन्यांवर विचार सुरू
लघु आणि मध्यम उद्योगातील काही कंपन्या, वस्त्रोद्योग आणि स्टार्ट अप् क्षेत्रातील काही कंपन्यांबाबत हा विचार केला जात असल्याचे कामगार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.