मुंबई – ‘ब्रेक द चेन’ची प्रक्रिया राज्यभर सुरू आहे. या कालावधीत गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची तारीख वाढविली असून आता १४ जून २०२१ पर्यंत मोफत असणार अशी घोषणा केली आहे.
शिवभोजन थाळी १४ जून २०२१ पर्यंत मोफत!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
राज्यात करोनाचे संकट असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र अजूनही कोरोनावर नियंत्रण मिळाले नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी 1 जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी १४ जून २०२१ पर्यंत मोफत असणार अशी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवभोजन थाळी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. सुरुवातीला ही थाळी 10 रुपयांमध्ये देण्यात येत होती मात्र करोना काळात नंतर ती 5 रुपयांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करताना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली होती.
राज्यात आतापर्यंत 48 लाखांहून अधिक नागरिकांनी मोफत जेवणाचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण झालं आहे.