माणसी पाच किलो प्रमाण; गर्दी न करण्याचे आवाहन
पुणे – करोनामुळे देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे गरीब, मध्यमवर्गीय व मजुरी करणाऱ्या नागरिकांच्या हाताला काम नसल्याने सरकारने 10 एप्रिलपासून रेशन कार्डवरील प्रत्येक माणसी पाच किलो तांदूळ मोफत देणार असून, पुढील तीन महिन्यांचा मोफत तांदूळ शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात येणार आहे.
करोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने रेशनदुकानांवर असणारे अंगठा घेण्याचे मशीन देखील बंद केले आहे. 2 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत नागरिक दर महिन्याचे धान्य घ्यायला येत आहेत. मात्र, 10 एप्रिलपासून सरकारकडून मोफतचा तांदूळ मिळणार असल्याने एका रेशन दुकानदाराकडे तांदूळ घ्यायला येणारी साधारण 400 कुटुंब आहेत.
करोना संसर्गामुळे एक मीटर अंतर ठेवत ग्राहक उभे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशात संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक बरोजगार झाले आहेत. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना शासनाने शिधापत्रिका धारक नागरिकांना दर महिन्याचे माणसी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ, धान्य दर महिन्याप्रमाणे दिले आहे. मात्र, सरकारने मदत म्हणून 10 एप्रिल पासून प्रत्येक शिधापत्रिका धारकाला माणसी पाच किलो तांदूळ दिला जाणार आहे.
मोफत तांदूळ वितरणाची बाब विभागाकडून समजली तसेच पुढील मे व जून महिन्यात प्रत्येक महिन्याच्या धान्याबरोबर प्रत्येक माणसी पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. लोक एकत्र येणार आहेत तसेच यासाठी प्रत्येक वेळी वाहन, हमाल आहेतच त्याऐवजी एकाच वेळी दर महिन्याचे व मोफतचे धान्य एकत्र दिले असते, तर योग्य झाले असते.
-विजय गुप्ता, खजिनदार, ऑल इंडिया फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन