नाशिक – अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे, अशा निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
छगन भुजबळ यांनी आज नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरेदेखील दोन-दोन दिवस पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून प्रती कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार आहे. तसेच नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांच्या रेल्वे मार्गावरील आंदोलनामुळे महाराष्ट्रात येणारा अन्नधान्याचा पुरवठा खंडित झाला आहे.
तरी आगामी सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही. यासाठी भारतीय अन्न महामंडळाकडे अतिरिक्त साठ्यातून मदत मागितली असल्याचेही त्यांनी सांगितले.