मुंबई: देशासह राज्यात लॉकडाऊन-3 लागू करत काही शिथिलताही देण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन आणि बसेसचीही व्यवस्था केली जात आहे.
मात्र प्रवासासाठी संबंधित व्यक्तीकडे डॉक्टरचे सर्टिफिकेट असणे गरजेचे होते. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी घरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची डॉक्टरांकडे रांग लागली होती. अनेक ठिकाणी या गरजू मजूर, कामगारांची लूटही होत होती. हीच बाब लक्षात घेत या मजुरांची, कामगारांचे प्रवासाआधी विनाशुल्क मेडिकल चेकअप होणार आहे.
प्रवास सुरु करण्यापूर्वी या मजूर, कामगारांची डिजिटल थर्मोमीटरच्या साहाय्याने स्क्रीनिंग होणार आहे. यासाठी या प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सरकार किंवा महापालिकेच्या डॉक्टरांची त्याठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर कोणतीही ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं नसलेल्यांना प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. यासंबंधीचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत.